पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७३७
विद्या आणि संशोधन
 

 अमेरिकेत स्थायिक झालेले महाराष्ट्रीय शास्त्रज्ञ शं. ल. गोखले हे दुसरे मोठे संशोधक होत. मॅग्नेटिझमवरील यांचा सिद्धान्त 'गोखले लॉ' म्हणून प्रसिद्ध आहे. इतका बहुमान यांना मिळाला. याशिवाय व्होल्टेजचे मापन करण्यासाठी व इतरही अनेक शास्त्रीय उपकरणे यांनी तयार केली आहेत. स्फेरिकल हारमॉनिक्स या उच्च गणितातील विषयावरही यांनी संशोधन केले आहे.

 जोशी श्रीधर सर्वोत्तम हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक आहेत. पदार्थाच्या अणुमात्रावर प्रकाशाचा होणारा जो परिणाम त्याच्याविषयीचा यांचा सिद्धान्त 'जोशी इफेक्ट' म्ह्णून जगाने मान्य केला आहे. यांनी कमी खर्चाची व अधिक उष्णता देणारी विद्युत् भट्टीही तयार केली आहे.

 गोडबोले नरसिंह नारायण हे महाराष्ट्रीय रसायनशास्त्रज्ञ आहेत. बनारस हिंदू विद्यापीठात यांनी तूप, मांस, दूध, मासे, अंडी यांवर संशोधन करून अनेक नवे सिद्धान्त मांडले आहेत.

 तळपदे शिवराज बापूजी हे गेल्या शतकातील संशोधक होत. वेदवाङ्मयातील यंत्र व तंत्र यांचा अभ्यास करून यांनी 'मरुत्सखा' नावाचे विमान तयार केले व मुंबईच्या चौपाटीवर १८९५ साली सयाजीराव गायकवाड, न्या. रानडे यांच्या समक्ष त्याचे उड्डाण यशस्वीही करून दाखविले. पुढे या प्रयत्नांचा पाठपुरावा झाला नाही.

 भिसे शंकर आबाजी हे अमेरिकेत स्थायिक झालेले दुसरे महाराष्ट्रीय होत. ॲटोमिडीन या औषधाच्या शोधामुळे यांची विशेष कीर्ती झाली. पण यंत्रविद्येत यांनी प्रामुख्याने संशोधन केलेले आहे. लंडनच्या रॉयल सोसायटीचे सभासद होण्याचा बहुमान यांना मिळाला होता. यांच्या साठाव्या वाढदिवशी न्यू यॉर्क विद्यापीठाने त्यांना डी. एस्सी. ही पदवी देऊन यांचा गौरव केला.

 जोशी नारायण विष्णू यांचे संशोधन शेतीरसायन या विषयावरील आहे. बिहारमधील इपीरियल ॲग्रिकल्चरल इन्स्टिटयूट, पुसा, या संस्थेचे हे प्रवर्तक होते. दुधाचे दही करणारे, वनस्पतीमधील सेल्युलोजची विघटना करणारे असे जंतू यांनी शोधून काढले. संशृंग शेंगेच्या मुळावरील गाठीमधील हवेतील नायट्रोजन शोषून घेणाऱ्या जंतूंचाही शोध यांनी लावला.

 आघारकर शंकर पांडुरंग हे विख्यात महाराष्ट्रीय वनस्पतिशास्त्रज्ञ होत. 'भारतातील रुक्ष भागात उगवणाऱ्या वनस्पतींचा स्वप्रसार व त्यांचे मूलस्थान' हा यांच्या संशोधनाचा विषय, शेतीविज्ञान व वनस्पतिशास्त्र यांतील यांचे संशोधन मोलाचे आहे. आंबा, केळी, भाताचे पीक यावरही यांनी संशोधन केलेले आहे.

 खानोलकर वसंत रामजी हे महाराष्ट्रीय वैद्यकशास्त्रज्ञ होत. १९५० साली यांची इंटरनॅशनल कॅन्सर रिसर्च कमिशनचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. इतके
 ४७