पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७३५
विद्या आणि संशोधन
 

आणि वैद्यक या विषयांतच होत असे. बाकीच्या विषयांत अनुभवातून मिळालेले ज्ञान एवढीच सामग्री होती. भारतात नानाविध उद्योग चालत. त्यासाठी रसायन, पदार्थ- विज्ञान, पाणी, वायू यांच्या गती इ. विषयांचे अवश्य ते ज्ञान येथे त्या त्या लोकांना असलेच पाहिजे, हे मागे सांगितलेले आहेच. येथे विद्यापीठे होती. त्यांत रसायन, पदार्थविज्ञान यांचे संशोधन किती होत असे हे समजण्यास मार्ग नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे की अभ्यासपूर्वक व हेतुतः संशोधन करणे ही अलीकडची पाश्चात्य देशातील विद्या आहे. भारतात तिची प्रगती मुळीच झालेली नव्हती. मध्ययुगातली येथली परिस्थिती हे कोणी कारण म्हणून सांगतात. पण ते तितकेसे खरे नाही. कारण युरोपात हीच स्थिती होती. नवे सिद्धान्त सांगणाऱ्यांना पोप तर देहान्त प्रायश्चित देत असे. आणि अराजक तर सर्वत्रच होते. तरी प्राणपणाने तेथील शास्त्रज्ञ विद्येची उपासना करीत असत. तशा तऱ्हेची वृत्तीच या देशात कधी नव्हती. आणि इ. सनाच्या आठव्या दहाव्या शतकानंतर मागे सांगितल्याप्रमाणे येथे निवृत्ती, मायावाद, परलोकनिष्ठा, शब्दप्रामाण्य, कलियुगकल्पना यांचा जोर झाल्यामुळे भारतीयांच्या अंगचे विद्याभिलाष, ईर्षा, आकांक्षा, विजिगीषू वृत्ती हे गुण अजिबातच लोपले. आणि आजही एकंदर समाजात या वैफल्याचाच प्रभाव दृष्टीस पडतो. अशा स्थितीत येथे जे संशोधन झाले ते पाश्चात्यांच्या संपर्काने व त्यांच्या अनुकरणानेच झाले यात शंका नाही.
 या संशोधनातील सृष्टिविज्ञानातील संशोधनाचा प्रथम विचार करू.
 या क्षेत्रात मुंबईचे अरदेशीर करसेटजी यांचा सर्व प्रथम उल्लेख केला पाहिजे. (१८४१). यांत्रिक व नौकानयनातील सुधारणांसाठी व वैज्ञानिक कौशल्यासाठी त्यांना इंग्लंडच्या रॉयल सोसायटीच्या फेलोशिपचा मान मिळाला. हा मान मिळविणारे करसेटजी हे भारतातलेच नव्हे, तर सर्व पौर्वात्य देशांतील पहिलेच शास्त्रज्ञ होत.

सृष्टिविज्ञान
 सृष्टिविज्ञानात संशोधन करून ज्यांनी जगाच्या शास्त्रीय ज्ञानात भर घातली अशा संशोधकांच्या नावांची विषयवार यादी मो. वा. चिपळूणकर यांनी दिली आहे. (महाराष्ट्र जीवन, खंड २ रा, पृ. ११४) त्यांतील काही नावे विषयवारीने येथे देतो.
 गणित व ज्योतिषशास्त्र- लो. टिळक, केरूनाना छत्रे, शं. बा. दीक्षित, व्यं. बा. केतकर, ग. स. महाजनी, वि. वा. नारळीकर, डी. डी. कोसांबी, पां. वा. सुखात्मे, व. शं. हुजूरबाजार, एस. एस. शिश्वेश्वरकर, इत्यादी.
 पदार्थविज्ञान- शं. ल. गोखले, एन. आर. तावडे, गो. रा. परांजपे, के. आर. दीक्षित, एच. जे. अर्णीकर, जी. एस गोखले, मो. वा. चिपळूणकर, आर. के. असुंडी,