पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
७१८
 

 रानडे यांनी लोकजागृतीचे हे जे मोठे कार्य या आठदहा वर्षांत व पुढील वीस पंचवीस वर्षात केले त्यालाच उद्देशून टिळकांनी म्हटले आहे की 'थंड गोळा होऊन पडलेल्या महाराष्ट्राला त्यांनी सजीव केले.'

मवाळ पक्ष
 सुरेन्द्रनाथ बॅनर्जी यांच्याप्रमाणेच देशाच्या उत्कर्षासाठी एक सर्व हिंदुस्थानची राष्ट्रीय संस्था असावी असे सर्व प्रांतांतील पुढाऱ्यांना वाटत होते. मुंबईचे मंडलीक, तेलंग, मेथा, मद्रासचे अय्यर, नायडू, आनंदाचार्लू, बंगालचे आनंद मोहन बोस, उमेशचंद्र बॅनर्जी, असे लोक त्यात होते. रानडे यांनी पुण्यात जे कार्य चालविले होते त्याच धर्तीवर यांनी आपापल्या प्रांतांत कार्य चालविले होते. दादाभाई व रानडे हे अर्थातच या सर्वांच्या मागे उभे होते. या लोकांच्या मनात काँग्रेससारखी राष्ट्रीय सभा स्थापन करावी असे होते खरे, पण त्यासाठी सर्वस्वी वाहून घेण्याची तयारी कुणाचीही नव्हती आणि त्यासाठी लागणारे धैर्यही त्यांच्यात नव्हते. सरकारी इंग्लिश अधिकारी ह्यूम, वेडरबर्न व कॉटन यांनी व विशेषतः ह्यूम यांनी पुढाकार घेतला नसता, तर काँग्रेसची स्थापना झालीच नसती. खुद्द नामदार गोखले यांनीच हा अभिप्राय दिला आहे. ते म्हणतात, 'राष्ट्रसभेचे प्रस्थापक एक इंग्रज गृहस्थ नसते तर कोणाही हिंदी माणसाला तिची स्थापना करता आली नसती. कारण त्या वेळी राजकीय चळवळीसंबंधी इतका वहीम होता की अधिकाऱ्यांनी ती कोणत्या ना कोणत्या मिषाने दडपून टाकली असती.'

हयूम यांचा हेतू
 हयूम, वेडरबर्न यांना तरी काँग्रेससारखी संस्था स्थापावी असे का वाटत होते ? त्यांना स्पष्ट दिसत होते की हिंदुस्थानात असंतोष माजत आहे. निम्म्याहून अधिक लोक अर्धपोटी आहेत. ठिकठिकाणी बंडाळ्या चालू आहेत. वासुदेव बळवंतासारखे लोक त्यांचे नेतृत्व करीत आहेत. अशा स्थितीत हे असेच चालू राहिले तर केव्हा तरी याचा भडका होईल व सर्वत्र अशांतता व अराजक माजेल आणि त्यात इंग्लिशांचा व्यापार आणि बहुधा त्यांची सत्ता यांचीही आहुती पडेल. तेव्हा या अंतरात धुमसणाऱ्या असंतोषाला वाट करून द्यावी, त्यातून काही मार्ग काढावा आणि सुशिक्षित लोक देशात निर्माण करीत असलेल्या राष्ट्रीयत्वाला राजनिष्ठ वळण लावावे, अशा हेतूने वरील प्रागतिक, नेमस्त पुढाऱ्यांच्या साह्याने त्यांनी १८८५ साली काँग्रेसची स्थापना केली. तिचे पहिले अधिवेशन मुंबईला भरले.

लोकजागृती- संदेश
 पण कायदे-कौन्सिलात लोकनियुक्त सभासद असावे, आय. सी. एस. ची परीक्षा हिंदुस्थानात घ्यावी, अशा मामुली मागण्यांचे ठराव करण्यापलीकडे या अधिवेशनात