पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७१७
राजकारण
 

कृपेने स्वयंशासनास पात्र होईल व ब्रिटिश साम्राज्यात मांडलिकी स्वराज्याचे हक्क तिला प्राप्त होतील, असे थोडक्यात न्यायमूर्तीचे सनदशीर राजकारणाचे तत्त्वज्ञान होते.

बरोबरीचा दर्जा
 त्यांनी १८७१ त सार्वजनिक सभेची सूत्रे हाती घेतली. ही सभा, गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांनी स्थापिली होती. तिच्या मार्फत 'स्वदेशी'ची चळवळ, प्रचार व संघटना प्रथम सुरू करण्यात आली. या सभेमार्फतच रानडे यांनी स्वदेशी उद्योगधंद्यांच्या ऱ्हासावर पुण्याला व्याख्याने दिली व दादाभाईचा द्रव्यशोषणाचा सिद्धान्त लोकांना समजावून दिला. १८७३ साली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीची पाहणी करण्याचे काम सभेने अंगावर घेतले. १८७४ साली ब्रिटिश पार्लमेंटात हिंदी जनतेचे प्रतिनिधी असावे, असा एक अर्ज पार्लमेंटकडे सभेने पाठविला. १८७६-७७ साली दुष्काळ पडला असता शेतकऱ्यांची गाऱ्हाणी सरकारपुढे ठेवून त्यांची दाद लावण्याचे कार्य सभेने केले. १८७७ साली व्हिक्टोरिया राणीला 'हिंदुस्थानची सम्राज्ञी' असा किताब देण्याचा दिल्लीला समारंभ झाला. त्या वेळी सार्वजनिक सभेतर्फे सार्वजनिक काका तेथे गेले होते व राणीला मानपत्र देऊन हिंदी जनतेच्या मागण्या सरकारपुढे तेथे मांडण्याचे धैर्य त्यांनी दाखविले. 'हिंदी लोकांना ब्रिटिश राष्ट्राच्या बरोबरीचा राजकीय व सामाजिक दर्जा प्राप्त करून द्या आणि जबाबदारीचे हक्क भोगून हिंदी लोकांना स्वावलंबी व पुरुषार्थी बनण्याचे शिक्षण द्या', अशा स्वरूपाच्या या मागण्या होत्या.

काकांचे भाषण
 याच वेळी काकांनी सभेला उद्देशून मोठे उद्बोधक भाषण केले. 'आपण सर्व जातींचे, धर्माचे, प्रांतांचे थोर हिंदी लोक येथे जमलेले आहां. यातून हिंदुस्थानच्या ऐक्याचा व राष्ट्रीय पुनरुज्जीवनाचा प्रश्न सुटेल. आपण एक प्रकारे हिंदुस्थानातील एकत्र राष्ट्राचे पार्लमेंटच आहां. त्याचप्रमाणे हिंदुस्थानातील सर्व संस्थानांची व राष्ट्राच्या राजकीय संबंधाची सभाच आहे. यातूनच हिंदुस्थानचा व इंग्लंडचा कधीही न तुटणारा संबंध झाल्याच्या योगाने जगामध्ये ज्या मोठ्या गोष्टी घडणार आहेत त्यांचा हा केवळ प्रारंभ आहे.'
 अशा प्रकारे डिझरायली व लॉर्ड लिटन यांनी जो दरवार आपल्या साम्राज्यसत्तेचे प्रदर्शन करण्यासाठी भरविला होता त्यातच संधी साधून पुण्यातील मुत्सद्यांनी अखिल भारतीय संयुक्त राज्य, जबाबदारीचे हक्क, ब्रिटिश राष्ट्राच्या बरोबरीचा दर्जा आणि हिंदी पार्लमेंट वगैरे भावनांचे बीज हिंदी लोकांच्या अंतःकरणात रोविले. या दरबारास सुरेंद्रनाथ बॅनर्जी आले होते. राष्ट्रसभेची कल्पना आपणांस तेथूनच सुचली असे त्यांनी म्हटले आहे.