पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



३८.
राजकारण
 



अविभाज्य
 ब्रिटिश कालात झालेली धार्मिक क्रांती, समाजपरिवर्तन व ब्रिटिशांची आर्थिक साम्राज्यशाही याचा येथवर विचार केला. आता या कालातला राजकीय इतिहास पाहावयाचा आहे. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. येथल्या राजकारणाची ही जी परिणती झाली ती राजकीय चळवळीमुळे झाली यात शंकाच नाही. पण त्याच कालात झालेल्या धार्मिक व सामाजिक क्रांतीमुळे हे शक्य झाले हे आपण विसरू नये. आधी सामाजिक की आधी राजकीय असा वाद पुढे निर्माण झाला. राजकीय चळवळीच्या मानाने सामाजिक चळवळ गौण आहे, असे दादाभाई सांगत. टिळकांचेही तेच मत होते. सुईमागून दोरा तशा राजकीय सुधारणामागून सामाजिक सुधारणा येतात, असे ते म्हणत. पण स्वातंत्र्यानंतर तसे काही घडले नाही, हे आपण पाहातच आहो. गेल्या तीस वर्षात अपेक्षेच्या शतांशही सामाजिक सुधारणा झाल्या नाहीत. आणि स्वातंत्र्य मिळाले तेसुद्धा ज्या काही सामाजिक सुधारणा, धार्मिक सुधारणा येथे झाल्या त्यावाचून मिळाले नसते, हे मागील प्रकरणांतून सांगितलेच आहे. तेव्हा धर्म, समाजकारण, अर्थव्यवस्था व राजकारण हे सर्व विषय अविभाज्य आहेत, हे आपण ध्यानात ठेवले पाहिजे.