पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७११
आर्थिक साम्राज्यशाही
 

 असो. ब्रिटिश कालातील भारतातील अर्थव्यवहाराचा इतिहास हा असा आहे. ब्रिटिशांनी येथले उद्योगधंदे नष्ट केले आणि किसानकामगारांचे शोषण करून देश संपूर्ण नागविला. त्याविरुद्ध प्रथम पितामह दादाभाई यांनी पवित्रा घेतला. त्याचाच आधार घेऊन लो. टिळकांनी बहिष्कारयोगाची दीक्षा भारताला दिली. त्याच पायावर महात्माजींनी असहकारितेची अभूतपूर्व चळवळ करून स्वातंत्र्याचा लढा उभारला आणि तो यशस्वी करून दाखविला. या लढ्याच्या काळातच पंडितजींनी समाजवादी तत्त्वे काँग्रेसला स्वीकारावयास लावली आणि कार्यक्रमाची दिशा निश्चित करण्याचा प्रयत्न केला. हे परिवर्तन फार मोठे आहे. दादाभाई, रानडे, टिळक, गांधीजी, पंडितजी यांच्यासारखे अलौकिक नेते या भूमीला लाभले, म्हणूनच हे शक्य झाले. ब्रिटिशांच्या आर्थिक साम्राज्यशाहीतून स्वतःला मुक्त करून घेण्याचे सामर्थ्य भारताला प्राप्त झाले त्याचे श्रेय सर्वस्वी त्यांनाच आहे.