पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
७१०
 

काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्या वेळीही त्यांनी आपली प्रखर मते तशीच मांडली. आणि कार्यकारिणीत जयप्रकाश नारायण, नरेन्द्र देव, अच्युत पटवर्धन या अस्सल समाजवाद्यांना स्थान दिले.

केवळ तत्त्वे
 यानंतर काँग्रेसकडून पंडितजी काहीसे समाजवादी स्वरूपाचे ठरावही करून घेऊ लागले. कराची काँग्रेसने कामगारांच्या हिताचे ठराव केले व खनिज संपत्ती, रेल्वे, जलमार्ग, जहाजे, यांवर सरकारी नियंत्रण नियंत्रण किंवा मालकी असावी, असा ठरावही त्यांनी मंजूर करून घेतला. १९४५ साली जो निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला त्यात तर समाजवादाची जवळजवळ सर्व तत्त्वे मान्य करण्यात आली आहेत. 'राजकीय स्वातंत्र्य हे सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्यावाचून फोल आहे व ते प्रस्थापित करण्यासाठी सर्व महत्त्वाचे उद्योगधंदे राष्ट्राच्या स्वामित्वाचे असले पाहिजेत' अशी निःसंदिग्ध घोषणा त्या वेळचे काँग्रेसने केलेली आहे.

विपरीत तत्त्वज्ञान
 यावरून काँग्रेसला समाजवादी तत्त्वज्ञानाचे वळण पंडितजींनी दिले हे स्पष्ट आहे. पण इतकेच. त्या तत्त्वाप्रमाणे भांडवलदार जमीनदारांशी काँग्रेसने लढा केव्हाही उभारला नाही. ब्रिटिशांशी स्वातंत्र्याचा लढा चालू आहे, तेव्हा त्याच वेळी हा लढा नको, दोन्ही लढे एकदम पेलणार नाहीत, असे काँग्रेसचे नेते म्हणत असत. पण हे विपरीत बोलणे आहे. अस्पृश्य, दीनदलित यांच्याविषयी ते उलट बोलत असत. अस्पृश्यता नष्ट करणे हा काँग्रेसच्या विधायक कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग होता. अस्पृश्यता नष्ट होऊ लागली, भावी काळात आपल्या जीवनाला काही प्रतिष्ठा प्राप्त होईल अशी आशा अस्पृश्यांना, दीनदलितांना वाटू लागली तर ते स्वातंत्र्याच्या लढ्यात उत्साहाने सामील होतील, असे तेव्हा सांगितले जात असे. आणि ते युक्तच होते. आणि म्हणूनच तेच धोरण किसान कामगारांच्या बाबतीत अवलंबावयास हवे होते. उत्तर हिंदुस्थानात बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश येथे फार मोठी जमीनदारी होती. तेथील किसानांना काँग्रेसने जमीनदारांविरुद्ध लढ्यास उद्युक्त केले असते आणि भांडवलदारांविरुद्ध कामगारांना उभे केले असते तर त्यांची शक्ती संघटित होऊन स्वातंत्र्यलढ्यास मिळाली असती. तसे न झाल्यामुळे कम्युनिस्टांनी कामगारशक्ती ही स्वातंत्र्यलढ्याविरुद्ध उभी केली. त्या संघटना काँग्रेसने ताब्यात घेतल्या असत्या तर स्वातंत्र्यलढ्याला तर फायदा झाला असताच, पण स्वातंत्र्यानंतरही काँग्रेसच्या पाठीशी एक फार मोठी शक्ती उभी राहिली असती. ते न झाल्यामुळे २५/३० वर्षात दीन- दलितांचे, किसान कामगारांचे प्रश्न सोडविण्यात काँग्रेसला यश आले नाही. ती धनिकांच्याच आहारी गेली.