पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
७०६
 

त्यांची इतकी खात्री होती की भांडवलदार, जमीनदार, संस्थानिक यांना, तुमच्या विरुद्ध कोणी लढा उभारला तर सर्वस्व वेचून मी तुमच्यासाठी लढेन, असे त्यांनी आश्वासन दिले होते.

पंडितजींची टीका
 महात्माजींच्या अर्थशास्त्राचे येथे सविस्तर विवेचन करावयाचे नाही. ('भारतीय लोकसत्ता' या माझ्या ग्रंथात 'गांधीवाद व लोकसत्ता' या प्रकरणात ते मी केलेले आहे.) पंडितजींनी आपल्या आत्मचरित्रात त्यावर केलेली टीका फक्त येथे देतो. ते म्हणतात, 'आणि पुन्हा एकदा गांधीजींच्या उलट सुलट धोरणाचा विचार मनात येतो. एवढी कुशाग्रबुद्धी असून, आणि दलितवर्गाविषयी मनात आस्था असून, मरणोन्मुख, कष्टप्रद आणि अनर्थावह अशा पद्धतीचा त्यांनी काय म्हणून कैवार घ्यावा? प्रगतीच्या मार्गात खळगे खणून ठेवणाऱ्या जमीनदार, तालुकदार, भांडवलदारांवर ते आपला वरदहस्त ठेवीत आहेत हे काय? व्यक्तीच्या हाती अमर्याद सत्ता व संपत्ती द्यावयाची आणि मग तिचा उपयोग ती सर्वस्वी जनहितासाठी करील अशी उमेद बाळगावयाची, ही विश्वस्तपदाची कल्पना बुद्धीला कितपत पटते? प्लेटोच्या कल्पनासृष्टीतल्या राजर्षीना सुद्धा ही जबाबदारी संभाळणे जड गेले असते. काही काँग्रेसजनांच्या छातीत औद्योगीकरण म्हटले की धडकी भरते. औद्योगिक राष्ट्रात दिसून येणाऱ्या सर्व आपत्ती यांत्रिक उत्पादनामुळे उद्भवतात, अशी त्याची समजूत असावी. हे अज्ञान मोठे विलक्षण आहे. नेहमीच दुष्काळात खिचपण्यापेक्षा मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे बरे नव्हे काय? या व इतर अनेक कारणांमुळे आमचे शेतीविषयक व औद्योगिक प्रश्न संकुचित अशा स्वयंपूर्णतेच्या तत्त्वाने सुटणे इष्ट अथवा संभाव्य नाही, असे माझे मत झाले आहे. संदिग्ध व भावनामय शब्दांच्या पसाऱ्यात बुडी मारून बसणे योग्य होणार नाही. आपण परिस्थिती पारखून आपल्यात फेरफार केला पाहिजे. तरच इतिहासाच्या हातची शिकार होण्याऐवजी आपणाला इतिहासाच्या पाठीवर स्वार होता येईल.' (पृ. ५३२ )

कम्युनिस्ट पक्ष
 गांधीवाद प्रसृत होत होता त्याच वेळी भारताच्या आर्थिक जीवनात एका नव्या व प्रभावी आर्थिक तत्त्वाचा उदय झाला. ते तत्त्व म्हणजे समाजवाद. युरोपात आधीच्या शतकात कार्ल मार्क्स याने समाजवादाची प्रस्थापना केली. पण १९१७ साली रशियात बोल्शेव्हिक क्रान्ती होईपर्यंत त्याला एवढे महत्त्व प्राप्त झाले नव्हते. पण त्या क्रांतीमुळे सर्व जगाचे लक्ष तिकडे वेधले आणि हिंदुस्थानातले श्रीपाद डांगे, मिरजकर, शौकत उस्मानी, झाववाला, जोगळेकर, घाटे इ. तरुण प्रभावित होऊन १९२२ च्या सुमारास त्यांनी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली.