पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
७००
 

त्यातील हेतू आहे असे सांगितले. अर्थात हिंदी कारखाने डबघाईला यावे, हाच या मागील हेतू होता हे उघडच आहे. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी वेळोवेळी तसे जाहीरपणे सांगितलेही आहे. लॉर्ड रे याने स्वबांधवांना असा सल्ला दिला की 'त्यांनी हिंदुस्थानात भांडवल न्यावे; कारण तेथे मजुरी स्वस्त असून कामगार संघटना मुळीच नाहीत. त्यामुळे कामगारांचा किती रक्तशोष करावा वाला मर्यादा नाही.' व्हाइसरॉय लार्ड कर्झन यानेही जाहीरपणे सांगितले होते की 'ब्रिटिश कारखानदारीची वाढ करू देणे हेच सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे.' याच वेळी हुंडणावळीच्या दरात सरकारने असा बदल केला की त्यामुळे हिंदी निर्यात मालावर तीस टक्के जकात वसु लागली. इत्यर्थ हा की इंग्रजी राज्ययंत्र हे मुख्यतः हिंदी कष्टकरी जनतेचा रक्तशोष हे उद्दिष्ट पुढे ठेवूनच चालले होते. १९०५ साली हिंदुस्थानात ब्रिटिश कंपन्याचे १६५ कारखाने होते व त्यांचे वसूल भांडवल शंभर कोटी रुपये होते. ब्रिटिश भांडवलदारांनी हिंदुस्थान कसा ग्रासला होता हे यावरून कळून येईल.

संरक्षित व्यापार
 न्या. मू. रानडे हे, ब्रिटिश राज्य हे ईश्वरी वरदान आहे, असे म्हणत असले तरी ब्रिटिशांचे खुल्या व्यापाराचे तत्त्व त्यांना मान्य नव्हते. दोन समबल राष्ट्रांत खुला व्यापार ठीक आहे, पण हिंदुस्थान उद्योगधंद्याच्या दृष्टीने प्राथमिक अवस्थेत आहे. तेव्हा त्याच्या व्यापाराला संरक्षण मिळाले पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले. अर्थातच ब्रिटिशांनी तिकडे लक्षही दिले नाही. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनी, अमेरिका, जपान ही बलवान राष्ट्रे स्पर्धेत उतरल्यानंतर ब्रिटिश व्यापारालाच जेव्हा चटका बसू लागला, तेव्हा संरक्षक जकातीचे तत्त्व त्यांना पटू लागले. पण तोपर्यंत हिंदुस्थानचा रक्तशोष पुरा होत आला होता.

स्वदेशी
 ह्या रक्तशोष लोकांच्या ध्यानात येऊ लागला, तेव्हा प्रथम स्वदेशी आणि नंतर बहिष्कार या विचारांचा उदय झाला. १८७१ साली येथे सार्वजनिक काकांनी सार्वजनिक सभा स्थापन केली. न्या. मू. रानडे यांनी ती हाताशी घेऊन तिच्यामार्फत सार्वजनिक कार्याला प्रारंभ केला. सार्वजनिक काका तेव्हापासून स्वतःच्या हातांनी काढलेल्या सुताची खादी नेहमी वापरीत असत. आणि त्यांनी स्वदेशी मालाची दुकाने काढून स्वदेशी मालाला उत्तेजन देण्याचा प्रचार चालविला. १८७२ व १८७३ साली रानडे यांनी स्वदेशी उद्योगधंद्यांच्या ऱ्हासावर आणि त्यांच्या उपायासंबंधी व्याख्याने दिली आणि समाइक भांडवलाच्या मंडळ्या स्थापून यांत्रिक कारखाने काढल्याखेरीज औद्योगिक उन्नती होणार नाही हे तत्त्व लोकांच्या मनावर टसविले. १८७३ साली महाराष्ट्रातील निरनिराळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक