पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४५
अस्मितेचा उदय
 

महाराष्ट्राचा किती अभिमान होता हे तेथे दिलेल्या इतर वचनांवरूनही स्पष्ट होईल.
 कोऊहल कवीच्या लीलावई काव्यातला उताराही वर दिला आहे. कुवलयमालाकार उद्योतनसूरी व चिनी प्रवासी ह्युएनत्संग यांनी महाराष्ट्राचे व तेथील शूर लोकांचे केलेले वर्णन तेथे दिले आहे. या सर्व उताऱ्यांवरून या भूमीतील लोकांना अस्मिता प्राप्त झाली होती हे स्पष्ट दिसून येते. या भूमीत नित्य कृतयुग असते, येथे कलियुग कधी येतच नाही, ही भूमी म्हणजे धर्माचा आधार आहे, येथली सृष्टी म्हणजे ब्रह्मदेवाची सृष्टिरचनेची शाळा आहे, असे उद्गार कवींच्या मुखांतून निघतात, तेव्हा त्या लोकांच्या राष्ट्रीय अभिमानाविषयी शंका घेण्याचे कारण नाही.

स्वभाषा
 देशाचा जसा त्या काळचे लोक अभिमान बाळगीत होते तसाच किंवा त्याहूनही उत्कट असा आपल्या भाषेचाही अभिमान त्यांच्या मनात होता, हेही विपुल प्रमाणा- वरून दिसून येते.
 श्रीरामशर्मा हा प्राकृत भाषेचा व्याकरणकार होता. त्याच्या मते महाराष्ट्री ही सर्व भाषांच्या मूलस्थानी असून ती महाराष्ट्रातच निर्माण झालेली आहे. शौरसेनी, मागधी या, त्याच्या मते, महाराष्ट्रीपासून निर्माण झाल्या आहेत.

सर्वासुभाषास्विह हेतुभूतां भाषां महाराष्ट्रभुवां पुरस्तात् |
निरूपयिष्यामि यथोपदेशः श्रीरामशर्माहमिमां प्रयत्नात् ॥

 (रामतर्कवागीश, प्रा. ल. स्तबकर अवतरण - 'मराठी भाषा उद्गम आणि विकास', कृ. पां कुळकर्णी. पृ. ९३ )
 राजशेखराने जसा महाराष्ट्राचा गौरव केला आहे तसाच त्याने, तो स्वतः संस्कृत- पंडित असूनही, महाराष्ट्री प्राकृताचाही केला आहे.

परुस सक्कअ पाऊअ बंधोवि होई सुकुमारो ।
पुरिस महिलाणं जेत्तिअमिहंतरं तेत्तिअमिमाणं ॥

 संस्कृत कर्कश तर प्राकृत भाषा सुकुमार आहे. राकट पुरुष व नाजूक स्त्री यांच्यात जेवढे अंतर असते तेवढे या दोन भाषांत आहे.
 धर्मोपदेशमाला हा नवव्या शतकातील ग्रंथ आहे. त्यात 'मरहठ्ठ भासा ' हिचा विशेष गौरव केला आहे.

सलिलयपदसंचारा, पयडिय मयणा, सुवण्ण रयणेल्ला
मरहठ्ठ भासा कामिणि य अडवीय रेहन्ती.

 मराठी भाषा सुवर्णरचनावती, सललितपदसंचारा, प्रकटितमदना अशी कामिनी आहे. ती आपल्या वैभवात विराजत आहे.
 'गउडवहो' या प्राकृत महाकाव्याचा कर्ता वाक्पतिराज याच्या पुढील उद्गारांवरून प्राकृत - महाराष्ट्री- भाषेचा त्याचा अभिमान व्यक्त होईल.