पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
६८४
 

जे वर सांगितलेले प्रयत्न करावयास हवे ते त्यांनी केले नाहीत.

मराठे-वर्णश्रेष्ठत्व
 पण एवढ्यावर हे भागले नाही. वर्णश्रेष्ठत्वाचा अभिमान ब्राह्मणांइतकाच मराठ्यांनाही आहे. त्यामुळे ब्राह्मणब्राह्मणेतर एवढेच या चळवळीला रूप न राहता मराठा- मराठेतर असे रूप तिने धारण केले. ब्राह्मणब्राह्मणेतर या चळवळीचे मूळ रूप अगदी गेले. ते राहिले असते तर ब्राह्मणेतर सर्व समाज एक झाला असता. पण सर्व हिंदुमात्र एक हे जसे ब्राह्मणांना मान्य नाही तसेच सर्व ब्राह्मणेतर एक हे मराठ्यांनाही मान्य नाही. ब्राह्मण हा ईश्वर आणि मनुष्य यांच्यातील दलाल म्हणून तो निंद्य, ब्राह्मण म्हणून नव्हे, अशी जोतिबांची भूमिका होती. पण छत्रपती शाहू महाराजांनी, क्षात्रजगद्गुरू हे पीठ निर्माण करून ते तत्त्व सोडले. कारण पुन्हा दलालाचीच प्रतिष्ठापना त्या योगे झाली. श्री. ठाकरे यांनी मराठ्यांच्या या वृत्तीवर कडक टीका केली आहे (के. सी. ठाकरे, शेतकऱ्यांचे स्वराज्य, प्रकरण ६). महर्षी शिंदे यांनी ब्राह्मणेतर चळवळीला राष्ट्रनिष्ठ वळण लावण्याचा फार प्रयत्न केला होता. मराठ्यांनी सरकार किंवा ब्राह्मण चळवळ्ये यांच्या पंखाखाली न जाता आपला स्वतंत्र संघ काढावा व राष्ट्रसेवा करावी असे ते म्हणत. त्याप्रमाणे त्यांनी स्वतः १९१७ साली मराठा राष्ट्रीय संघ स्थापन केला; पण ते अस्पृश्यांसाठी चळवळ करतात म्हणून मराठ्यांचा त्यांच्यावर राग होता. म्हणून त्या संघात सामील न होता त्यांनी 'मराठा लीग' ही स्वतंत्र संस्था स्थापिली आणि महर्षीचा प्रयत्न अयशस्वी झाला.

केशवराव जेधे
 ब्राह्मणेतर चळवळीला राष्ट्रीय वळण लावण्याचे कार्य दे. भ. केशवराव जेधे यांनी केले. बारा वर्षे प्रथम या चळवळीत ते होते. पण त्यांना राष्ट्रीयत्व कोठे दिसेना म्हणून श्री. ठाकरे यांच्यापेक्षाही कडक टीका करून ते तीतून बाहेर पडले. ते लिहितात, 'ब्राह्मणेतर चळवळीत राष्ट्रीय वृत्तीला वाव नव्हता; ती सर्वस्वी सरकारची मर्जी राखणारी चळवळ होती. बारा वर्षे मी ब्राह्मणेतर चळवळीत काढली, पण आपण देशाची सेवा करावी, असे मला कधीही वाटले नाही. या चळवळीच्या पुढाऱ्यांची दृष्टी अराष्ट्रीय व मतलबी होती. स्वार्थापलीकडे ते पाहात नव्हते' (प्रसाद, दिवाळी अंक, १९५५). हे सर्व घडले ते १९३० च्या नंतर. महात्माजींच्यापासून अनेक मराठ्यांना स्फूर्ती प्राप्त झाली. इंग्रज हा आपला खरा शत्रू हे जाणून ते सत्याग्रहाच्या राष्ट्रीय चळवळीत सामील झाले. आणि त्यामुळे स्वातंत्र्याचा लढा यशस्वी ठरला.

गुणविकासाचे तत्त्व
 विष्णुशास्त्री, टिळक व एकंदर काँग्रेस यांनी जो राष्ट्रीय लढा सुरू केला त्याच