पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
६७८
 


स्त्री-शिक्षण
 स्त्रियांची दुःस्थिती नाहीशी होण्यास स्त्रीशिक्षण हा उपाय लोकहितवादींनी सांगितला आहे. ते म्हणतात, 'स्त्रिया सुशिक्षित होतील तेव्हा आपला अधिकार स्थापतील. आणि संसार सुखास हानी करणाऱ्या पंडितांपासून असा तहनामात्र करून घेतील.' जर स्त्रियांस थोडे ज्ञान असते तर त्यांनी पंडितांच्या जुलमाचा विचार काढून, जे पुनर्विवाह करू नये म्हणतात त्यांचे श्रीमुखात दिली असती. पण अज्ञान व भोळसरपणा यामुळे सर्वत्र जुलूम चालतो असा नेम आहे.' यातील शेवटचे वाक्य हिंदुस्थानच्या गेल्या हजार वर्षांच्या इतिहासाचे सूत्र आहे. ज्ञानाचा, भौतिक विद्येचा अभाव, अज्ञान व भोळसटपणा यामुळे सर्वत्र जुलूम चालू शकला व या देशाला पारतंत्र्य आले. त्याची सर्व संपत्ती गेली आणि हा सर्व समाज शतधा भंगून गेला. सामर्थ्य असे कसलेही त्याच्याजवळ राहिले नाही.

जोतिबा
 म. जोतिबा फुले यांनी नेमके हेच वर्म जाणले होते आणि त्यांनी अस्पृश्यांसाठी व स्त्रियांसाठी शाळा स्थापून प्रत्यक्ष कार्याला प्रारंभही केला. त्यांचे असामान्यत्व यातच आहे. गेल्या शतकात समाजसुधारणेचे तत्त्वज्ञान अनेक थोर पंडितांनी सांगितले; पण प्रत्यक्ष कृती करणारे अपवादात्मकच होते. त्यांमध्ये म. फुले हे अग्रणी होत. त्यातही विशेष असे की त्यांनी आपल्या स्त्रीला शिक्षण देऊन शिक्षिका केले आणि त्या साध्वीनेही घरचा विरोध, कुटाळांची टवाळी याची परवा न करता आपल्या पतीच्या कार्यात अखंड सहकार्य केले. जोतिबांनी यानंतर एक पाऊल आणखी पुढे टाकून आपल्या समोरचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. यानंतर दहावीस वर्षांनी १८७३ साली जोतिबांनी 'सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ब्राह्मणांच्या वर्चस्वातून बहुजन समाजाला सोडविणे, हे जोतिबांचे प्रमुख उद्दिष्ट होते. आणि ते बहुजन समाजातील असल्यामुळे त्यांच्या कामाला वेग आला. पण ब्राह्मणांच्या वर्चस्वामागे काय तत्त्वज्ञान आहे, बहुजन समाज ब्राह्मणांच्या आहारी जाण्याची ऐतिहासिक कारणे कोणती आहेत, याचा कसलाही अभ्यास न करता जोतिबांनी वाटेल त्या काल्पनिक उपपत्ती मांडल्या. त्यामुळे त्यांच्या चळवळीमागची उदात्त प्रेरणा, थोर ध्येयनिष्ठा, असामान्य धैर्य यांचा जोतिबांच्या बरोबरच लोप झाला आणि ब्राह्मणद्वेष एवढेच रूप त्या चळवळीला राहिले. त्यामुळे केशवराव जेधे, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासारख्यांनाही सत्यशोधक समाजावर टीकास्त्र चालवावे लागले व त्या चळवळीपासून दूर व्हावे लागले. पण हे काही असले तरी जोतिबांचे समाजसुधारणेच्या क्षेत्रातले स्थान आजही अढळ आहे यात शंका नाही.