पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६७७
समाज परिवर्तन
 

भटांत व अतिशूद्रांत मला इतकेच अंतर दिसते की एक बोलता राघू व एक न बोलता राघू, परंतु ज्ञान एकच. अतिशूद्र गरीब, ते आपला लहानपणा जाणतात; पण भट मूर्ख असून स्वतःला ज्ञानी समजतात व गर्व करतात.' असे हे ब्राह्मण हिंदु समाजाचे नेतृत्व करतात हे त्याचे दुर्दैव होय असे सांगून, इंग्रजी राज्यात ब्राह्मणांचे महत्त्व नाहीसे होत आहे याबद्दल लोकहितवादींनी समाधान व्यक्त केले आहे.

सरदार तसेच
 लोकहितवादींनी ब्राह्मणांवर जशी टीका केली तशीच राजे लोक, सरदार यांच्यावरही प्रखर टीका केली आहे. 'हे राजे व सरदार इंग्रजांपुढे लाचार होऊन त्यांना म्हणतात की तुम्ही देवासारखे आहात. रयतेच्या कल्याणाची चिंता ते कधीच करीत नाहीत. पुण्यात लायब्ररी केली, पण ग्रंथ वाचवयास सरदार कोणी येत नाही. आम्ही थोर, चार शिपाई, घोडे, अबदागीर घेतल्यावाचून ते बाहेर पडत नाहीत. कुळंबी नांगर धरून मेहनत करतात आणि जहागिरदार किंवा इनामदार त्यास फक्त कोंडा ठेवून त्यांचे दाणे घेतो व आपण रेशीमकाठी धोतरे नेसतो व कामकाज काही करीत नाही.'
 सारांश असा की वंशपरंपरेवरून योग्यता ठरवितात. गुण कर्म पाहात नाहीत. हिंदुस्थानच्या सर्व अधःपाताचे हे मुख्य कारण आहे.

स्त्री-सुधारणा
 स्त्री-जीवनाविषयीही लोकहितवादींनी असेच पुरोगामी विचार मांडले आहेत. 'सांप्रत हिंदू लोकांत फारच मूर्खपणा आहे. यास्तव स्त्रियांची दुर्दशा फार आहे. प्राचीन काळी असे नव्हते. तेव्हा स्त्रियांना मान फार होता. पण पुढे मुसलमानांच्या अनुकरणाने त्यांच्या चाली हिंदू लोकांस लागल्या. आणि स्त्रियांचा अपमान होऊ लागला. कन्या झाली की लोक नाक मुरडतात. स्त्रियांची जनावरासारखी अवस्था झाली आहे. आता तरी हिंदू लोकांस उमज पडो व जसे पुरुष तशा स्त्रिया हे त्यांस समजो. आणि जे सुधारक हिंदू असतील त्यांनी निर्भयपणे कामास प्रारंभ करावा.'
 स्त्रियांच्या सुधारणेविषयी आपली तळमळ याप्रमाणे अनेक पत्रांत लोकहितवादींनी व्यक्त केली आहे. सतीची चाल, बालविवाहपद्धती, विधवाविवाहास बंदी, आणि स्त्रीला अज्ञानात ठेवण्याची प्रथा ही स्त्रियांच्या दुःस्थितीची, त्यांच्या मते, मुख्य कारणे होत. या सर्व रूढींवर व त्यांना आधारभूत असलेल्या शास्त्रावर त्यांनी फार प्रखर टीका केली आहे. ते म्हणतात 'मनू जर ईश्वरांश असेल तर कोणे एके स्त्रीचा नवरा आधी मरणार नाही. असे का केले नाही ? पण स्त्रियांवरील या आपत्तींचा बंदोबस्त मनूच्याने होत नाही, तर त्याचे शास्त्र फिरविण्यास काय चिंता आहे ?'