पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
६७६
 


दादोबा
 दादोबा पांडुरंग यांनी स्थापिलेल्या 'मानवधर्म सभा,' आणि 'परमहंस सभा' यांची माहिती मागे दिलीच आहे. धर्मसुधारणा हे जसे त्यांचे उद्दिष्ट होते तसे जातिभेदनाश हेही उद्दिष्ट होते. आणि त्याला पहिल्याइतकेच किंबहुना थोडे जास्तच महत्त्व होते. ख्रिस्त्याच्या हातचा पाव व मुसलमानाच्या हातचे पाणी घेतले पाहिजे हे नियम त्यासाठीच होते. पण सभेची सर्व कामे गुप्तपणे चालविल्यामुळे या क्रांतिकारक कृत्यांचा समाजपरिवर्तनाला फारसा उपयोग झाला नाही. शिवाय, 'असो कृष्णगीता किंवा ख्रिस्तगीता, महम्मदाची वार्ता असे ना का' असा उपदेश ते करीत. कृष्णाच्या बरोबरीने ख्रिस्त व महम्मद यांचा उल्लेख करणे त्या वेळी कोणालाही पटण्याजोगे नव्हते. प्रार्थनासमाजाची एकंदर चालवणूक केवळ चर्चमधल्या ख्रिश्चनांच्या उपासने- सारखी होती, एवढे कारण, समाज त्यांच्यापासून दुरावायला, पुरले. मग येथे तर ख्रिस्ताला मोठे पद दिलेले होते. ते समाजाला कसे मानवणार ?

लोकहितवादी
 १८४८ साली लोकहितवादींची 'शतपत्रे' प्रसिद्ध होऊ लागली. समाजसुधारणेचा सर्वांगीण विचार त्यात केलेला दिसतो. वर्ण किंवा जाती ही जन्मावरून न ठरविता गुणांवर ठरवावी असे सांगताना ते म्हणतात, 'कर्मकरून जातीचा आणि वर्णाचा निश्चय करावा. ब्राह्मण असून नीच कर्म करील तर ब्राह्मण नव्हे. तसेच क्षत्रियाने ब्राह्मण कर्म केले तर तो ब्राह्मण व्हावा.' त्यांच्या मते प्राचीन काळी अशीच व्यवस्था होती. 'ब्राम्हण कुळात जन्मून कित्येक राजे झाले व कित्येक क्षत्रिय कुळात जन्मून ब्राम्हण झाले, असे पुराणातील कथांवरून दिसते. वाल्मीक हा प्रथम कोळी होता व नंतर ऋषी झाला. पराशराने शूद्र स्त्री केली. तिचाच मुलगा व्यास. इतर देशातही समाजात भेद आहेत. पण तेथे ते वंशपरंपरा नाहीत. हिंदुस्थानात तसे आहेत. हेच आपल्या अधःपाताचे कारण होय.'

ब्राह्मण- अर्थशत्रू
 ब्राह्मणांवर लोकहितवादींनी इतकी कडक टीका केली आहे की तितकी जोतिबांनी सुद्धा केली नसेल. हे ब्राह्मण अर्थशत्रू असून पाठांतरालाच विद्या समजतात. आपली वृत्ती अविच्छिन्न चालावी म्हणून त्यांनी आपले माहात्म्य वाढवून ठेवले आहे. आणि दुर्दैव हे की हिंदुस्थानातील सर्व जातींची ब्राह्मणांवर श्रद्धा आहे. कित्येक ब्राह्मण हीन, भ्रष्टाचारी, लोभी असे असतात. तरी आपण सर्व वर्णांचे गुरू आहो, असा तोरा ते मिरवितातच.
 ब्राह्मण व इतर जाती यांत लोकहितवादी मुळीच फरक मानीत नाहीत. ते म्हणतात,