पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
६६२
 


नवी धर्मतत्त्वे
 दादोबांच्या नंतरचे मोठे धर्मसुधारक म्हणजे लोकहितवादी हे होत. त्यांचा निर्देश वर केलाच आहे. नव्या धर्मतत्त्वांची सविस्तर मांडणी प्रथम त्यांनीच केली. ब्राह्मण हे त्या वेळी हिंदुधर्माचे गुरू मानले जात. पण ते अत्यंत हीन अशा कर्मकांडात्मक धर्माला कवटाळून बसले होते आणि त्यांच्या मनावर पुराणातील भाकडकथांचे फार वर्चस्व असे. वास्तव जगाकडे पाहण्याची कुवतच त्यांच्या ठायी नव्हती. पूर्वी अवतार घेऊन परमेश्वराने पृथ्वीचा भार हरण केला, तसाच आता इंग्रजांचा संहार करून तो करील, अशा जुनाट कल्पनांचे ते दास होते. त्यामुळे त्यांचे गुरुत्व नष्ट करण्यासाठी लोकहितवादींनी त्यांस विद्याशून्य, मूर्ख, बैल अशा कडक शिव्या देऊन त्यांची कमालीची निर्भत्सना केली. विचारस्वातंत्र्य, ईश्वरभक्ती, स्वदेशसेवा, स्त्रीपुंरुष समता, प्रवृत्तिमार्ग, गुणनिष्ट वर्णभेद, सत्याचरण, विद्यार्जन, सर्व मनुष्ये सारखींच आहेत, अशी त्यांची प्रमुख धर्मतत्त्वे होती. पाश्चात्य विद्येचा त्यांस फार अभिमान व संस्कृत विद्येचा त्यांना अत्यंत तिटकारा होता. प्राचीन काळच्या ऋषिमुनींना ते वंद्य मानीत. पण त्यांचे ग्रंथ प्रमाण मानावे, हे त्यांस मुळीच मान्य नव्हते. ते प्राचीन ब्राह्मण धर्मसुधारणेचा व लोकहिताचा विचार अहोरात्र करीत. पण तशा तऱ्हेचा एक तरी ब्राह्मण आज काशीपासून रामेश्वरापर्यंत आहे काय, असे ते विचारतात. रामशास्त्री प्रभुणे हे त्यांच्या मते खरे ब्राह्मण. ते होते तोपर्यंत राज्य कृतयुगासारखे चालले, असे ते म्हणतात. प्राचीन काळी असे ब्राह्मण होते. ते खरे विद्येचे व धर्माचे उपासक होते. पण पुढचे ब्राह्मण मूर्ख झाले व पाठांतर हीच विद्या असे मानू लागले. त्यामुळे हिंदुधर्माचा अधःपात झाला. लोकहितवादींनी कडक टीका केली आहे ती या ब्राह्मणांवर.
 एक गोष्ट या धर्मप्रकरणी ध्यानात येते. स्वदेशसेवा हा धर्म आहे, हे बाळशास्त्री यांच्यापासून प्रत्येकाने सांगितले आहे. ब्रिटिश विद्या येऊन पुरती दहापंधरा वर्षे झाली नाहीत तोच पाश्चात्य विद्याविभूषितांना राष्ट्रधर्माची जाण आली. हे मागल्या कित्येक शतकांत घडले नाही. म्हणूनच या काळातला प्रत्येक पंडित हा पाश्चात्य विद्येचा महिमा गाताना दिसतो. 'देश ही मातोश्रीच आहे' असे 'स्वदेशप्रीती' या पत्रात लोकहितवादींनी म्हटले आहे. 'जसे आपण मातोश्रीस वंद्य मानतो, व तिच्या पोटी आलेले सर्व बंधू प्रीतीने वागतात, तद्वत् या जमिनीवर जे आपण आहोत, ते सर्व एकमेकांचे बंधू आहाेंत व हा देश आपणा सर्वांना मातोश्री आहे.' 'स्वदेशहितास झटावे,' हीच लोकहितवादींच्या मते खरी धर्मसुधारणा आहे. युरोप याच सुधारणेमुळे उन्नत झाला, हे सांगताना ते म्हणतात, 'आपले देशाचे हित करावे, हा मुख्य धर्म युरोपात समजतात.' लोकहितवादींच्या सर्व सुधारणांचे सारभूत तात्पर्य या उताऱ्यात आले आहे.