पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६३१
प्रबोधनाच्या अभावी
 

असते, त्यांच्याविषयी आदर असता, तर जास्तीत जास्त लोकांना संस्कार करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले असते. कारण, 'ही कल्याणकारक वाणी शूद्रांनाही वर्ज्य नाही' असा वेदांचा निर्णय आहे आणि वेदांतील अनेक सूक्ते शूद्रांनी रचलेली आहेत. पण 'सूत्रकालापासूनच हा अमंगळ भेद सुरू झाला. दहाव्या शतकानंतर तो फारच जारी झाला. आणि वेदांचा आधार घेऊन, त्याविरुद्ध बंड करून उठण्याचे धैर्य येथे कोणीच दाखविले नाही. जातिभेदामुळे सर्वात जास्त वात झाला तो हा. क्रांती ही कल्पनाच भारतात रुजू शकली नाही आणि कित्येक प्रसंगी आमूलाग्र क्रांतीवाचून प्रगती ही अशक्य होऊन बसते. आजही हिंदू समाजाच्या प्रगतीच्या मर्गात पावलोपावली जातिभेद येत आहे. मग त्या वेळी काय असेल याची सहज कल्पना येईल.

क्षुद्र भेदापायी
 कासार जातीचे लोक स्वतःला सोमवंशीय क्षत्रिय मानतात. लग्नकार्यात कलशासह मिरवणूक काढण्याचा त्यांचा प्रघात होता. पण वऱ्हाडच्या लिंगायत वाण्यांनी याविषयी कज्जा केला. पण या वेळी निकाल कासारांच्या बाजूने झाला. खानदेशात अभीर ब्राह्मण व यजुर्वेदी ब्राह्मण यांच्यांत तंटा निर्माण झाला. यजुर्वेदी अभीरांना कमी लेखीत. पण याही वेळी निकाल अभीरांच्या बाजूने झाला. पण यातली ध्यानात ठेवण्याजोगी गोष्ट ही की अशा क्षुद्र गोष्टीवरून त्याकाळी कज्जे चालत. आणि त्यावरून मारामाऱ्याही होत. वेदमंत्रांचा घोष करताना आधी ऋग्वेद की यजुर्वेद की वाजसनेयी संहिता असा तंटा पडून वाजसनेयी लोकांनी प्रत्यक्ष मारामारीच केली !

अर्थव्यवस्था
 जातिसंस्थेमुळे अर्थव्यवस्था स्थिर राहिली, असे काही पंडित सांगतात. प्रत्येक जातीचा व्यवसाय बांधलेला होता. त्यामुळे प्रत्येकाला पोटाच्या उद्योगाची विवंचना या समाजात नव्हती, असे म्हणतात. पण याला फारसा अर्थ नाही. एकतर एवढ्या तेवढ्या कारणाने जातीत पोटजाती पडत आणि मग त्यांच्यांत धंद्यावरून तेढ माजे. शिवाय अनेक जाती एकच धंदा करीत हे प्रसिद्धच आहे. शिवाय व्यवसाय अगदी बांधून ठेवणे हे फार कठीण आहे. कारण सोनारकी, सुतारकी एवढ्या नावावरून काही ठरत नाही. त्या व्यवसायात पुष्कळ प्रकार आहेत व त्यावरून जातीत तेढ येते. पटवेकऱ्याचे काम रेशीम वळण्याचे, ते काम आपलेही आहे, असे जंगमांचे म्हणणे, त्यावरून तेढ निर्माण झाली. तेव्हा पटवेकऱ्यांचे काम रेशमाचे व जंगमांचे कापसाचे, असा निकाल झाला. आता या दोन व्यवसायांत जातिभेद करण्याजोगे काय आहे ? पण तेवढे कारण तेढीला पुरले. ब्राह्मण हा सेनापती होता, सावकार होता, मंत्री होता, शिपाई होता, आचारी होता, पाणक्या होता, पुजारी होता, भिक्षुक होता, गुरू होता. आता हे सर्व व्यवसाय काय एक आहेत ? यांची प्रतिष्ठा सारखी