पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६२५
साहित्य आणि कला
 


नृत्य !
 नृत्यकलेबाबत असेच आहे. जानपद रूपात ही कला येथे होतीच. पण तीत वैयक्तिक आत्माविष्कार नसल्याने तिला कला म्हणता येत नाही. लेजीम, भलरी किंवा मुलींचे घुमा, आगोटा हे खेळ, यांत काही प्रमाणात सामुदायिक भावाविष्कार होत असल्याने, त्या प्रकाराच्या नृत्यांना, रोहिणी भाटे यांच्या मते, जरा वरचा दर्जा आहे. हे अगदी खेळ या प्रकारात गणता येणार नाहीत. तमाशात होणारे, लावणी गाताना होणारे नृत्य हे यापेक्षा आणखी वरच्या दर्जाचे. ते लयबद्ध, नियमबद्ध व काहीसे तंत्रबद्धही असते. काही ठराविक पद्धतीचा नैसर्गिक मुद्राभियनही या पद्धतीत आढळतो. तेव्हा हे नृत्यकलेच्या वाटेवरचे पुढचे पाऊल असे म्हणण्यास हरकत नाही.
 पण पारतंत्र्यामुळे म्हणा किंवा अन्य कारणामुळे म्हणा महाराष्ट्रात नृत्यकलेचा विकास या पायरीच्यावर झाला नाही. भरतनाट्य, मणिपुरी, कथाकली आणि कथक या नृत्यपद्धतींचे नाव सुद्धा परवा-परवापर्यंत महाराष्ट्रात आले नव्हते. या सर्व पद्धतींचा अभ्यास महाराष्ट्रात गेल्या तीस चाळीस वर्षातला आहे. मराठा कालात महाराष्ट्राने त्याची अशी नृत्यपद्धती विकसित केली नाही.

जगाच्या दृष्टीतून
 चित्र, मूर्ती, शिल्प या कलांत मराठा कालात महाराष्ट्र मागासलेलाच राहिला. स्वराज्याचे रूपांतर साम्राज्यात होऊ लागले, तसा येथील सरदार लोकांच्या हाती पैसा खेळू लागला. त्यातून त्यांनी आपापल्या गावी देवळे बांधली, वाडे बांधले, बागा तयार केल्या, तळी बांधून पाण्याची सोयही केली. पेशव्यांना वास्तू, चित्र, मूर्ती यांविषयी चांगली रसिकता होती. त्यांनी बांधलेल्या देवळांत व वाड्यांत उत्तम मूर्ती बसविल्या आणि भिंतींवर चित्रेही काढून घेतली. पण हे सर्व कारागिरी या सदरात येईल. वेरूळ, अजिंठा, घारापुरी ही महाराष्ट्रातलीच शिल्प आणि चित्रकला. पण वेरूळ- अजिंठ्याची इंग्रज येथे येईपर्यंत मराठ्यांना माहितीही नव्हती. मदुरा, कांची, विदिशा, कोणार्क येथील कला त्यांनी पाहिली होती. पण त्या दर्जाची कलाकार मंडळी मराठा कालात महाराष्ट्रात झाली नाहीत. पेशव्यांनी इंग्रज चित्रकार वेल्स याला नेमून एक चित्रकलेची शाळाही स्थापन केली होती आणि त्याच्याकडून व इतर इंग्रज चित्रकारांकडून नाना, महादजी, सवाई माधवरावाचा दरबार अशी चित्रेही काढून घेतली होती. पेशवे आणि त्यांचे सरदार हे चित्रसंग्रहही जवळ ठेवीत. नाना फडणिसाने पदरी चितारीही बाळगले होते. शिवाय विणकर, कुंभार, पाथरवट यांना ते उत्तेजनही देत. पण हा सगळा इतिहास पाहिल्यावर शेवटी निर्णय असाच होतो की दक्षिणेत, किंवा उत्तरेत किंवा पूर्वी महाराष्ट्रातच जी वास्तुकला, चित्रकला, मूर्तिकला होती, तशी मराठाकालात महाराष्ट्रात उदयास आली नाही. आजही विचार केला तरी असे दिसेल की कोणीही प्रवासी मराठाकालातली कला पाहण्यास महाराष्ट्रात येत नाही. कोणार्क,
 ४०