पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
६१८
 

 भाषेला सौंदर्य आणावे, असा सुद्धा यांचा प्रयत्न नसतो. आवेश, त्वेष, ध्वनी, उपरोध, कल्पनाप्रचुरता असे काही भाषासौंदर्य या ग्रंथात नाही. अगदी साध्या भाषेत महीपतीने आपली सर्व चरित्रे लिहिली आहेत.
 महीपतीनंतर भीम स्वामी व राजाराम प्रासादी असे दोन चरित्रकार होऊन गेले. हे दोघेही समर्थ संप्रदायातले होते. यांनी समर्थांचे चरित्र लिहिले आहेच. पण पुढे महीपतीने सांगितलेली बरीच चरित्रे यांनी पुन्हा सांगितली आहेत.
 इतिहास या दृष्टीने या चरित्रग्रंथांना फारसे महत्त्व नाही. यात स्थलकालनिश्चय नाही. दैवी चमत्कार सर्व असल्यामुळे कार्यकारणचिकित्सा नाही. आणि याच कारणामुळे स्वकालाचे दर्शनही नाही.

शाहीर
 संत, आख्यानकवी आणि चरित्रकार यांहून शाहिरांचे काव्य अगदी वेगळे आहे. मुख्य म्हणजे ऐहिक जीवन, मराठ्यांचे पराक्रम हा त्यांचा विषय आहे. अफजलखानाचा वध, तान्हाजीचा पराक्रम, पानपतचा संग्राम, राक्षसभुवनची लढाई, नारायणरावाचा खून, तळेगावचा संग्राम, खर्ड्याची लढाई, खडकी, अष्टी या लढाया हे त्यांचे विषय लाहेत. लावण्यांमध्ये त्यांनी शृंगार वर्णिला तो मराठा स्त्रीपुरुषांचा शृंगार आहे. त्यांनी दुःखे वर्णिली ती मराठ्यांची आहेत. अशा रीतीने केवळ पारलौकिकात बुडून राहिलेली मराठी कविता त्यांनी इहलोकात आणली आणि म्हणूनच हीच खरी मराठी काव्याची प्रभात, असे कोणी म्हणतात.
 अगीनदास-(अफजलखानाचा वध), व तुळशीदास- (सिंहगड) हे दोन प्रारंभीचे शाहीर. पण ज्यांची नावे विशेष गाजली ते सर्व शाहीर उत्तर पेशवाईत होऊन गेले. परशुराम, होनाजी, अनंत फंदी, राम जोशी, प्रभाकर, सगनभाऊ हे सहा शाहीर इ. स. १७५४ ते १८४० या काळातले आहेत.

उत्तरकालीन
 परशुराम हा जातीने शिंपी होता. तरुण वयातच तमाशाचा धंदा याने सुरू केला व स्वतःच लावण्या रचून त्यात तो त्या म्हणू लागला. याची ध्रुवपदे ठाशीव असतात. 'सतीला नाही बत्ती, हत्ती आहे शिंदळीच्या धरी', अशी सुभाषिते तो सहज रचतो. मल्हारराव होळकर, फत्तेसिंग गायकवाड यांसारख्या सरदारांवर आणि मुंबईकर इंग्रजांवरही याने पोवाडा रचला आहे.

घनःशाम
 होनाजी बाळा हा आपल्या 'घनःशाम सुंदरा' या अमर भूपाळीने फार प्रसिद्ध आहे. हा जातीने गवळी होता. [ संतकवींमध्ये जसे सर्व जातीचे संत होते तसेच