पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५४३
साम्राज्याचा विस्तार
 

 यावेळी स्वतः नानासाहेब दक्षिणेत गेला असता तर कदाचित काही कायमची व्यवस्था झाली असती. पण शाहूछत्रपती आसन्नमरण झाले होते. त्यामुळे तेथे मोठेच राजकारण निघाले होते. पुढे १७५१ साली त्याने निजामावर स्वारी केली आणि बुसी या फ्रेंच सेनापतीचा तोफखाना निजामाकडे असूनही पारनेरजवळ मराठ्यांनी त्याचा पराभव केला व निजामाकडचा चार लक्षांचा मुलूख मिळविला.

फक्त चौथाई
 यानंतर पुढच्या नऊ वर्षांत, अनेक राजकारणे, अनेक घडामोडी झाल्या. निजाम सलाबतजंग याला रामदासपंत नावाचा एक मोठा कर्तबगार दिवाण मिळाला होता. जानोजी निंबाळकरांसारखे मराठे फितूर करून त्याने मराठ्यांना अनेक वेळा शह दिला. पण १७५२ साली त्याच्याच बिथरलेल्या फौजेने त्याचा खून केला. निजाम सलाबत जंगाचा एक भाऊ गाजीउद्दीन दिल्लीला होता. तो मराठ्यांना अनुकूल होता. त्याला निजामपदी बसवावा असा नानासाहेबांचा बेत होता. पण निजाम उल्मुल्काचा धाकटा भाऊ निजाम अल्ली याच्या आईने तो दक्षिणेत आल्यावर त्याला विष घालून मारले (१७५२). तेव्हा भालकी येथे सलाबतजंगाशी तह करून खानदेशपर्यंतचा सर्व मुलूख मराठ्यांनी मिळविला. यानंतर १७५३, १७५४ व १७५५ साली नानाने लागोपाठ कर्नाटकावर स्वाऱ्या केल्या व खंडण्याही गोळा केल्या. १७५७ च्या लढाईत पुन्हा त्यांनी निजामाचा मोड केला. पण मराठे इकडे गुंतलेले असताना श्रीरंगपट्टणच्या बंदिराजाने पेशव्याने १७५५ साली घेतलेले सर्व परगणे परत घेतले. याच वेळी श्रीरंगपट्टणला हैदरचा उदय झाला व त्याचा मोड करणे हेच पेशवा माधवराव याचे एक काम होऊन बसले. १७६० साली निजामाचा कायमचा निकाल लावण्यासाठी मराठ्यांनी उद्गीर येथे त्याचा पुरा धुव्वा उडविला. पण त्यानंतर लगेच पानपतचे प्रककरण उद्भवून सदाशिवरावास तिकडे जावे लागले. दक्षिणचा बंदोबस्त त्यांच्या हाती आला. तसे कोणत्याही प्रांतात केव्हाही झाले नाही. दरसाल जाऊन चौथाई व इतर खंडणी वसूल करणे व तेवढ्या वेळापुरता बंदोबस्त ठेवणे एवढाच मराठ्यांच्या साम्राज्याचा अर्थ होता.

कर्तृत्व नाही
 कर्नाटकाच्या या प्रकरणावरून एक गोष्ट पुन्हा ध्यानात येईल की मराठी राज्यात एक हुकमत अशी नव्हती. आणि मराठ्यांच्या जवळ सर्व हिंदुस्थानचा कारभार आटपता येईल अशी कर्ती माणसे नव्हती. अशी माणसे निष्ठेने व भौतिक विद्येमुळे निर्माण होत असतात. पण मराठ्यांत या दोन्ही गोष्टींचा संपूर्ण अभाव होता. मराठ्यांच्या साम्राज्याचे स्वरूप जे वर वर्णिले आहे त्याचे मुख्य कारण हे आहे.