पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५१५
पेशवाईचा उदय
 


ग्रहयोग
 येथून पुढे शाहू छत्रपतींच्या पक्षाला ग्रहयोग जरा अनुकूल असे होऊ लागले १७१४ च्या फेब्रुवारीत आंग्रे त्या पक्षाला मिळाले आणि त्याच सालच्या ऑगस्ट- मध्ये ताराबाईना त्यांचा सावत्र मुलगा राजसबाईचा पुत्र संभाजी याने कैदेत टाकले आणि कोल्हापूरला आपली स्वतंत्र गादी स्थापिली. हा संभाजी काही शाहूपक्षाला अनुकूल होता असे नाही. निजामाला मिळून स्वराज्याविरुद्ध कारस्थाने करणे, एकंदर मराठा समाजाचा, महाराष्ट्राचा, विचार स्वप्नातही न करणे या दृष्टीने वर सांगितलेल्या मराठा सरदारांच्या जातीचाच तो होता. पण या वेळी तरी ताराबाईचा स्वराज्याला होणारा उपद्रव थंड पडण्यास तो कारण झाला. म्हणून हा ग्रहयोग अनुकूल होय, असे म्हटले आहे. वास्तविक या वेळी ताराबाईचा मुलगा शिवाजी हा अठरा वर्षाचा होऊनही कसलीही कर्तबगारी दाखवीत नव्हता. तेव्हा शाहूराजांच्या हाती सत्ता जाण्यातच मराठी राज्याचे हित आहे, हा विचार ताराबाईला कळावयास हवा होता आणि त्यांनी आपले स्वराज्यविघातक उद्योग थांबवावयास हवे होते. पण मराठी राज्याच्या हिताची दृष्टी डोळ्यांपुढे असेल तेव्हा असे विचार संभवतात. ती नसल्यामुळे ही बाई मरेपर्यंत आपले विघातक उद्योग करीतच राहिली होती. आणि विशेष दुर्दैवाची गोष्ट ही की अनेक मराठा सरदार आणि अष्टप्रधानांपैकी काही प्रधानही तिला शेवटपर्यंत साथ देत राहिले.

सय्यद बंधू
 ताराराणी निष्प्रभ झाल्या हा अनुकूल ग्रहयोग असे वर म्हटले. तसाच दिल्लीचा बादशहा फरूकसीयर याने सय्यद हुसेन अली याची दक्षिणच्या सुभ्यावर नेमणूक केली हा दुसरा अनुकूल ग्रहयोग होय. हा ग्रहयोग पहिल्याच्या शतपटीने अधिक लाभदायक होता. सय्यदच्या या नेमणुकीमुळे दक्षिणच्या राजकारणाचा सर्व ओघ बदलून गेला. शाहूछत्रपती व मराठी स्वराज्य यांचे भवितव्य त्यामुळे निश्चित झाले.
 १७१२ च्या फेब्रुवारीत बहादूरशहा मरण पावला आणि जहांदरशहा तख्तावर आला. पण १७१३ च्या जानेवारीत त्याला ठार मारून फरुकसीयर बादशहा झाला. या बादशहाला तख्त मिळविण्याच्या कामी सय्यद बंधूंचे फार मोठे साहाय्य झाले होते. ते इतके की पुढे सर्व सत्ताच सय्यद हसन व हुसेन यांच्या हाती गेली आणि बादशहाला त्यांच्याविषयी द्वेष उत्पन्न होऊन तो त्यांच्या नाशाची खटपट करू लागला. त्यातलाच एक डाव म्हणून, त्या बंधूंची जोडी फोडण्यासाठी त्याने हुसेन अलीची दक्षिणच्या सुभ्यावर १७१५ च्या मे महिन्यात नेमणूक केली.
 त्याच्या आधी निजाम उल्मुल्क दक्षिणचा सुभेदार होता. तो मराठ्यांचा हाडवैरी होता. हुसेन अली काही फार निराळा नव्हता. पण बादशहाने त्याच्या नाशाचे डाव