पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
५१२
 


वैयक्तिक धर्म
 तत्कालीन धर्मकल्पनेचे स्वरूप लक्षात यावे म्हणून खटावकर घराण्याच्या धार्मिक वृत्तीची कल्पना येथे देतो. खटावकर हे देशस्थ ब्राह्मण. संस्कृत विद्येविषयी त्यांचा मोठा लौकिक होता. स्वतः कृष्णराव हा विद्वान असून विष्णुसहस्रनामावर द्वैतमताची टीकाही त्याने लिहिली होती. शंभुछत्रपतींच्या वधानंतर औरंगजेबाने कृष्णरावाला खटावची जहागीर दिली. ती स्वीकारण्यात त्याची विष्णुभक्ती कोठे आड आली नाही. खटाव येथे याने एक दत्तमंदिर बांधले. जेजुरीचा खंडोबा हे याचे कुलदैवत होते. तेथले सध्याचे मंदिर यानेच बांधले आहे. या घराण्यातले अनेक पुरुष विद्वान आणि साधुवृत्तीने राहणारे होते, असा त्यांचा लौकिक आहे.
 शिवछत्रपतींनी स्वधर्म व स्वराज्य यांचे ऐक्य मानून लोकांवर ते संस्कार केले, दुष्ट, तरुक यांची सेवा हा अधर्म होय, अशी शिकवण दिली, ती मराठा समाजात कितपत रुजली ते यावरून ध्यानात येते. तुरुक सेवा हा अधर्म आहे, असे या सरदारांच्या स्वप्नातही कधी आले नाही. त्यांचा धर्म सर्व वैयक्तिक होता. खंडोबा, दत्त यांची मंदिरे बांधणे व परलोकसाधना करणे यापलीकडे धर्माचे काही कार्य आहे, असे त्यांना वाटतच नव्हते. धारणात् धर्मः।, प्रभवार्थाय लोकानां धर्मस्य नियमः कृतः।, हे विचार त्यांच्या मनाला कधी शिवलेच नाहीत. धर्माचे सामाजिक स्वरूप त्यांनी कधी जाणलेच नाही.
 आणि जे देवधर्माच्या क्षेत्रात तेच राजकारणाच्या पराक्रमाच्या क्षेत्रात होते. मराठा सरदार आणि एकंदर हिंदू समाज हा समाज म्हणून जगायला कधी शिकलाच नाही. हे सर्व सरदार व्यक्ती म्हणूनच जगत होते. व्यक्तिगत मोक्ष हा कितीही उच्च असला तरी तो व्यक्तिगत स्वार्थच आहे, असे लो. टिळकांनी म्हटले आहे. हे पारलौकिक क्षेत्रात जर खरे आहे तर ऐहिक क्षेत्रात ते त्याच्या दसपटीने, शतपटीने खरे आहे. पण हिंदूंचे ऐहिक क्षेत्रातले जीवन असेच आहे. धर्मात ते जसे व्यक्ती म्हणून जगतात तसेच इहलोकात, राजकीय क्षेत्रातही व्यक्ती म्हणूनच जगतात.

दमाजी थोरात
 दमाजी थोराताचे उदाहरण पहा. रामचंद्रपंताने यास प्रथम पुढे आणिले. पुणे व सुपे हे दोन परगणे त्यास जागीर म्हणून दिले होते. १७०८ साली शाहूछत्रपतींच्या भेटीस तो व रंभाजी निंबाळकर गेले असताना त्यांनी उद्धट वर्तन केले व तेव्हापासून त्यांनी स्वराज्यात दंगा सुरू केला. काही दिवस त्यांनी ताराबाईचा पुरस्कार केला, आणि त्या १७१४ साली कैदेत पडताच ते मोगलांना जाऊन मिळाले.
 दक्षिणेच्या कारभारावर प्रथम दाऊदखान, नंतर निजाम व त्यानंतर हुसेन अल्ली असे मोगल सुभेदार होते. त्या सर्वास हे मराठा सरदार नमून वागत. १७१६ साली हुसेन अल्लीने पोशाख देऊन थोरातबंधूंचा गौरव केला व त्यांना बादशाही सेवेत घेतले.