पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
२६
 

हितकारक आहे आणि सर्व सद्गुणांचा या भूमीत परिपोष होतो, अशी त्यांची श्रद्धा होती. 'महंत राष्ट्र म्हणौनि महाराष्ट्र, महाराष्ट्र निर्दोष आन सगुण, धर्म सिद्धी जाये ते माहाराष्ट्र', अशी महानुभाव ग्रंथकारांची वचने प्रसिद्ध आहेत. (आचारपाठ, १ ले सूत्र ) ' महाराष्ट्री विद्या आणि पुरुष असे' हे वचन लीळाचरित्रात एकदोनदा आले आहे. (एकांक-लीळा क्र. ४. पूर्वार्ध-लीळा क्र. २५०) चक्रधरांच्या तोंडचे उद्गार वर दिलेच आहेत. त्यावरून महाराष्ट्र हा प्रदेशवाचक शब्द ज्ञानेश्वरांच्या आधी निश्चित रूढ झाला होता असे दिसते.
 त्या काळी त्या लेखकांच्या मनात महाराष्ट्राची व्याप्ती काय होती हे कोठे स्पष्ट झालेले नाही. पण चक्रधराविषयी लिहिताना उत्तरकालच्या लोकांनी ते अगदी स्पष्ट केले आहे. 'देश म्हणजे खंडमंडळ | जैसे फले ठाणा पासौनि दक्षिणसि मऱ्हाटी भाषा जेतुला ठायी वर्ते ते एक मंडळ | तयासी उत्तरे बालाघाटाचा शेवट असे ऐसे एक खंडमंडल | मग उभय गंगातीर ( गोदातीर ) तेही एक खंडमंडळ | आन तयापासोनि मेघंकर घाट ते एक खंडमंडळ | तयापासोनि अवघे वराड ते एक खंडमंडळ | परी अवघे मिळोनि महाराष्ट्र बोलिजे किंचित किंचित भाषेचा पालट भणौनि खंडमंडळे जाणावी.' हा उतारा तेराव्या शतकातील आचार - महाभाष्य या ग्रंथातील आहे. फलटण, बालाघाट, लोणार - मेहकर, गोदापरिसर व वऱ्हाड एवढा प्रदेश म्हणजे महाराष्ट्र, असा लेखकाचा अभिप्राय आहे. कृष्णमुनी तथा डिंभ या लेखकाने 'श्री ऋद्धिपूर महत्त्व' या ग्रंथात पुढीलप्रमाणे महाराष्ट्राच्या सीमा दिल्या आहेत. 'विंध्याद्री- पासून दक्षिणदिशेसि कृष्णानदीपासून उत्तरेशी । झाडी मंडळापासून पश्चिमेसी कोकणपर्यंत, महाराष्ट्र बोलिजे । चक्रधर क्रीडा केली जेथे जेथे ' यावरून महानुभावांच्या मनात महाराष्ट्र म्हणजे कोणता देश होता ते स्पष्ट होईल.

राजशेखर
 राजशेखर हा नाटककार व साहित्यशास्त्रज्ञ इ. सनाच्या दहाव्या शतकात होऊन गेला. तो बहुधा महाराष्ट्रीय असावा. आपल्या 'बालरामायण' या नाटकात त्याने अकालजलद या आपल्या पणजोबांचा महाराष्ट्रचूडामणिः । असा उल्लेख केला आहे. हा ब्राह्मण होता. पण याची स्त्री अवन्तीसुंदरी चव्हाण ही क्षत्रिय होती. 'कर्पूरमंजरी' हे त्याचे नाटक महाराष्ट्री प्राकृतात आहे. त्यात चाहुआण कुलमोलिमालिआ राअसेहरकइन्दगेहिणी ' असा तिचा त्याने गौरवपूर्वक उल्लेख केला आहे. बालरामायणात, लंकेहून सीतेसह राम परत जात होते त्या वेळी, सुग्रीव रामाला म्हणाला, ' भरताग्रज, अयमग्रे महाराष्ट्रविषयः ।' रामचंद्रा, हा समोर महाराष्ट्र देश आहे. या ठिकाणी रामाने सीतेला कुंतल व विदर्भ या महाराष्ट्रातील खंडमंडळाचे वर्णन करून सांगितले. कुंतल ( सातारा, कोल्हापूर हा भाग ) हा ' मदनाचे स्थान' आहे व विदर्भ म्हणजे 'सारस्वती जन्मभू: ' आहे असे राम म्हणतो. स्वयंवराला जमलेल्या राजांत कुंतल देशाचा