पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४९९
प्रेरणांची मीमांसा
 

कलुषाच्या स्वाधीन केला असा एक रूढ समज आहे. पण तो खरा नाही. त्यांनी राजद्रोही अशा प्रधानांना देहांत शासन दिले हे खरे. पण अष्टप्रधान व्यवस्था त्यांनी मोडून टाकली, असा याचा अर्थ नाही. ती व्यवस्था त्यांनी पहिल्याप्रमाणेच पुढे चालविली होती. मोरोपंत पेशव्यांचा मुलगा निळो मोरेश्वर यास त्यांनी पित्याचे पेशवेपद दिले. त्या पदावर तो शाहूच्या आगमनापर्यंत होता. रघुनाथ नारायण हणमंते कर्नाटकातून आला. त्याला त्यांनी अमात्यपद दिले आणि त्यांच्यामागून त्यांचा मुलगा नारोपंत याची त्यावर नियुक्ती केली. रामचंद्रपंतास सचिवपदी नेमले. प्रल्हाद निराजी यालाच न्यायाधीशाची जागा दिली. दत्ताजी त्रिमळ यास मंत्रिपद दिले. हंबीरराव मोहिते हे सेनापती होतेच. त्याच्या मागून महादजी पानसंबळ त्या जागी आला आणि तोही अल्पावकाशात मृत्यू पावल्यामुळे संताजी घोरपडे यांची तेथे नेमणूक झाली. खंडो बल्लाळ यास चिटणिशी सांगण्यात आली. अगदी नवीन असे प्रधानपद म्हणजे छंदोगामात्याचे. त्या पदी कविकलश याची नेमणूक करण्यात आली.

कविकलश-वर्चस्व
 यांतील कविकलश किंवा कवजी याच्याबद्दल अनेक प्रवाद आजपर्यंत रूढ होते. तो मोंगलाच्या तर्फेच आलेला होता, त्यांना तो आतून फितूर होता, मद्य व स्त्री ही व्यसने त्यानेच संभाजीराजांना लावली आणि शेवटी त्यांना पकडून देण्याची कामगिरीही त्यानेच केली, अशी त्याची प्रतिमा बखरीमुळे जनमानसात इतके दिवस उभी होती. पण या त्याच्या वर्णनात सत्यांश मुळीच नाही, तो छत्रपतींचा एकनिष्ठ सेवक होता, असे अलीकडच्या संशोधकांनी कागदपत्रांच्या साह्याने सिद्ध केले आहे.
 पण अलीकडच्या संशोधकांनी त्याची केलेली वर्णने वाचून कविकलश हा कोणी विशेष कर्तबगार पुरुष होता, असे मुळीच दिसत नाही. मोरोपंत पिंगळे, अनाजी दत्तो, प्रतापराव गुजर, नेताजी पालकर इ. पुरुषांचे कर्तृत्व ठळकपणे डोळ्यांत भरते, तसे कविकलशाचे भरत नाही. आणि अशाही स्थितीत त्याला मोठा अधिकार दिला गेल्यामुळे आणि हळूहळू त्याचे वर्चस्व राज्यकारभारात वाढत गेल्यामुळे, रामचंद्रपंत, शंकराजी नारायण, संताजी, धनाजी यांच्या कर्तबगारीला अवसर मिळाला नाही आणि इतर कोणी नवे कर्तबगार पुरुष उदयाला आले नाहीत. वर अनेक वेळा सांगितले आहे की शंभुछत्रपतींना नवे कर्ते पुरुष निर्माण करता आले नाहीत, त्याच्या अनेक कारणांपैकी हे एक मोठे कारण असावे, असे निश्चित वाटते. वर निर्देशिलेले सर्व कर्ते पुरुष शिवछत्रपतींच्या हाताखाली होते. राजारामांच्या काळी त्यांनी फारच मोठा पराक्रम केला, हे महशूरच आहे. तरी शंभुछत्रपतींच्या काळी ते निस्तेजच राहिले याचे, कविकलशाचे अवाजवी वर्चस्व, हे कारण असले पाहिजे, असे सहज मनात येते.
 छत्रपती राजाराम यांनी अधिकारग्रहण केल्यानंतर जिंजीला अष्टप्रधानांची नव्याने नेमणूक करण्यात आली. त्यात प्रतिनिधी हे नवे पद निर्माण करण्यात येऊन