पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
४९६
 

दिले आणि येथूनच दुराव्याला सुरुवात झाली. दुसरे कारण म्हणजे त्या दोघांचे स्वभाव. संताजी हा शिस्तीचा कडक भोक्ता होता. लष्करातली शिवछत्रपतींची स्त्रियांविषयीची, लुटीविषयीची शिस्त काटेकोरपणे पाळली पाहिजे, असा त्याचा कटाक्ष होता. बेशिस्त माणसाला तो कडक शिक्षा करी, केव्हा केव्हा हत्तीच्या पायाशी देई. या उलट धनाजी होता. तो शूर, पराक्रमी व कुशल सेनानी होता. पण शिस्तीच्या बाबतीत ढिला असे. याचा परिणाम असा झाला की संताजीचे लोक त्याच्यावर रुष्ट असत व त्याला सोडून धनाजीकडे येत. यामुळे वैमनस्य आणखी वाढे. वतने देण्याच्या बाबतीत संताजी व धनाजी पुष्कळदा दोन भिन्न वतनदारांचे पक्ष येत. त्यावरून वाकडेपणा जास्तच होई.
 हे प्रकरण विकोपाला गेले. त्याचे आणखी एक मोठे कारण म्हणजे संताजीचा एककल्ली व काहीसा उद्धट स्वभाव. राजाराम महाराजांशी सुद्धा तो भांडण करी, मतभेद तीव्रतेने बोलून दाखवी. 'स्वामींच्या समोर मुद्दे घालू नयेत' असे शंकराजी नारायण याने त्याला परोपरीने समजावून सांगितले, तेवढ्यापुरता तो दबे. पण पुन्हा मूळपदावर येई. राजाराम महाराजांना त्याचे ते वर्तन अगदी असह्य झाले आणि शेवटी त्यांनी त्याचे सेनापतिपद काढून धनाजीला दिले. यावेळी राजाराम महाराजांच्या मनात धनाजीने भरवून दिले की संताजी उद्दाम झाला आहे. त्याला मृत्यूची शिक्षा दिली पाहिजे. रामचंद्रपंताला लिहिलेल्या पत्रात राजारामांनी स्वच्छच लिहिले आहे की 'संताजी घोरपडे यांनी स्वामीचे पायाशी हरामखोरी केली आहे. यास्तव त्यास सेनापतिपदावरून दूर केले आहे.'

यादवी
 याच प्रकरणाचा शेवटी विपरीत परिणाम होऊन संताजी व धनाजी यांची जिंजीच्या उत्तरेस आयेवारकुटी येथे प्रत्यक्ष लढाईच झाली. पुढे संताजीचे लोक त्याला हळू- हळू सोडून गेले. आणि तो रानोमाळ भटकू लागला. आणि अशातच नागोजी माने याने त्याचा खून केला. आणि त्याचे शिर बादशहाकडे पाठवून शाबासकी मिळविली. नागोजी मान्यांचा मेहुणा अमृतराव निंबाळकर याला संताजीने हत्तीच्या पायी दिले होते. म्हणून त्याचा त्याने असा सूड उगवला. पण या प्रकरणात एकटा तोच दोषी होता असे नाही. संताजीला पकडून आणावे असा राजारामांनी हुकूमच दिला होता. आणि संताजीचा धनाजी पाठलाग करीत होता. काही कागदपत्रातले उतारे देऊन सरदेसाई यांनी असे दाखवून दिले आहे की संताजीला नाहीसा करण्यात छत्रपती, धनाजी व इतर काही सरदार यांचाही हात होता.
 मुकर्रबखान, लुत्फुल्लाखान, सर्जाखान, कामिमखान, झुल्फिकारखान, अलोमर्दाखान अशा मोठमोठ्या मोगल सेनापतींना ज्याने नामोहरम केले, मोगली लष्कर अनेकवार धुळीस मिळविले, औरंगजेबाचे सारे मनोरथ ढासळून टाकण्याचे बव्हंशी श्रेय ज्याला आहे, त्या थोर सेनापती संताजीचा स्वकीयांकडून खून व्हावा यापेक्षा