पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४८७
स्वातंत्र्ययुद्ध
 

माजविण्याचा हेतू मनात धरून, मुक्त केले आणि अशा रीतीने हे स्वातंत्र्ययुद्ध संपले.
 या स्वातंत्र्ययुद्धाची मीमांसा पुढील प्रकरणात करावयाची आहे. या युद्धाचे फलित काय ते प्रारंभीच सांगितले आहे. हे युद्ध मराठ्यांनी जिंकले आणि शिवछत्रपतींनी स्थापिलेले स्वराज्य त्यांनी टिकवून धरले. दुसरे मोठे फल म्हणजे मोगल बादशहा आणि मोगल साम्राज्य यांचा कणाच या युद्धात मराठ्यांनी मोडून टाकला. पुन्हा भारतात पूर्वीसारखी मुस्लिम सत्ता कधीच प्रस्थापित झाली नाही. युद्धाच्या या फलिताविषयी वाद नाही. पण याही पलीकडे जाऊन आणखी चिकित्सा करणे अवश्य आहे. शिवछत्रपतींनी दिलेल्या नव्या प्रेरणा, नवा ध्येयवाद, नवी मूल्ये ही मराठ्यांनी टिकवून धरली काय, त्यांनी शिकविलेल्या राष्ट्रधर्माचे काय झाले, त्यांच्या आर्थिक तत्त्वांचे काय झाले, हे आपल्याला पाहिले पाहिजे. कारण या युद्धात जे घडले त्याचे परिणाम पुढे मराठी साम्राज्यावर, आणि त्यामुळेच अखिल भारतावर झालेले आहेत. म्हणून महाराष्ट्र संस्कृतीच्या दृष्टीने त्याचे विवेचन केले पाहिजे. पुढील प्रकरणात ते करू.