पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



२.
अस्मितेचा उदय
 



 महाराष्ट्राची पृथगात्मता केव्हापासून दिसू लागते याचा शोध गेल्या प्रकरणात आपण घेतला. तेराव्या शतकापासून मागे जाताजाता इ.पू. ३००/४०० या काळापर्यंत आपण प्रवास केला. त्यावरून तेव्हापासून या प्रदेशाची स्वतंत्र अशी महाराष्ट्री भाषा सिद्ध झालेली होती, आणि या भाषेमुळेच या प्रदेशाला व तेथील लोकांना पृथगात्मता प्राप्त झाली होती असे आपल्याला आढळून आले. या महाराष्ट्री प्राकृत भाषेपासूनच पुढे इ. सनाच्या चौथ्या पाचव्या शतकात महाराष्ट्रीअपभ्रंश भाषा निर्माण झाली व आणखी चारपाच शतकांनी या अपभ्रंशापासूनच मराठीचा जन्म झाला, असे दिसून आल्यामुळे महाराष्ट्राच्या पृथगात्मतेचा धागा त्या त्र्यंबकेश्वरापासून नेवाशापर्यंत अतूट चालत आला आहे, असे आपल्याला निःशंक म्हणता आले.

महाराष्ट्र - नामाभिधान
 आता यापुढील प्रश्न म्हणजे ज्या प्रदेशात या भाषांचा हा स्वतंत्र संसार थाटला गेला आणि विकसत राहिला त्या प्रदेशाच्या नामभिधानाचा होय. अगदी प्रारंभी महाराष्ट्राच्या सीमारेषा आपण पाहिल्या. गोवा ते दमण ही पश्चिम रेषा, तेथून तापीच्या काठाने भंडाऱ्यापर्यंत उत्तरसीमा व तेथून गोव्यापर्यंत तिरपी येणारी ती पूर्वदक्षिण सीमा अशा या भूमीच्या सीमा आहेत. या महाराष्ट्राच्या सीमा असे आज आपण निःशंकपणे म्हणतो. पण या भूमीला हे महाराष्ट्र असे अभिधान केव्हापासून प्राप्त झाले. ते आता पहावयाचे आहे.