पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
४८०
 


शून्याकार
 इ. १६८९ हे साल मराठ्यांच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवाचे आणि बाह्यतः तरी सर्वनाशाचे ठरले. मार्चमध्ये संभाजीमहाराजांचा वध झाला. सप्टेंबरमध्ये राजाराम महाराज जिंजीकडे निघून गेले आणि नोव्हेंबरमध्ये राजधानी असलेला किल्ला पडला. किल्ला पडला तेव्हा येसूबाई आणि शाहू बादशहाच्या कैदेत गेले. मागे खानाने रायगड सर्व लुटून फस्त केला आणि शिवछत्रपतींचे सिंहासन फोडून टाकले. म्हणजे या एका वर्षात मराठ्यांच्या स्वराज्याचा शून्याकार झाला.
 पण अशाही स्थितीत शिवछत्रपतींच्या पुण्यस्मरणाने व संभाजी महाराजांच्या प्रेरणेने या शून्यातून पुन्हा चैतन्य निर्माण झाले. आणि औरंगजेबाला गिळून स्वातंत्र्याचे रक्षण करण्यास ते समर्थ ठरले.

षण्मुखी नेतृत्व
 यावेळी महाराष्ट्राला राजा नव्हता किंवा सर्वाधिकारी असा एकही नेता नव्हता. पण रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, परशुराम त्रिंबक आणि खंडो बल्लाळ असे षण्मुखी नेतृत्व मराठ्यांना लाभले आणि या थोर कर्त्या पुरुषांनी स्वातंत्र्ययुद्ध पहिल्यापेक्षा अधिक जोमाने चालवून, मऱ्हाष्ट्र राज्य जिवंत ठेवले.
 आपण प्रथम प्रत्यक्ष स्वातंत्र्यसंग्रामाचे, युद्धाचे रूप पाहात आहो. संस्कृतीच्या इतर अंगांचे विवेचन त्यानंतर करावयाचे आहे. युद्धाच्या दृष्टीने पाहता १६८९ च्या पुढच्या काळात विशेष कोणाचा पराक्रम उठून दिसत असेल तर तो संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांचा आणि त्याच्या खालोखाल शंकराजी नारायण व परशुराम त्रिंबक याचा.

शंकराजी नारायण
 शंकराजी नारायण हा मावळ प्रांताचा विशेष माहीतगार होता आणि मावळे लोकांवर त्याची छापही चांगली होती. संभाजी महाराजांना पकडल्यावर औरंगजेबाने मावळातील किल्ले भराभर जिंकले. पण तशाच तडफेने शंकराजी नारायण याने मोगलांचा उच्छेद करून ते परत घेतले आणि पुढे वाईपर्यंत स्वारी करून वाईचा कोट व प्रतापगड हे किल्ले त्याने रगडून घेतले. शंकराजी नारायण हा अत्यंत कजाखी व धाडशी होता. म्हणूनच या पडत्या काळात तो बहुमोल कामगिरी करू शकला.

परशुराम त्रिंबक
 जसा शंकराजी नारायण तसाच परशुराम त्रिंबक. हा प्रथम कारकुनीत होता. पण लवकरच तो युद्धप्रसंग करू लागला आणि सुभालष्कर, समशेरजंग हे किताब त्याने