पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४७९
स्वातंत्र्ययुद्ध
 

वध केला त्याच साली व त्याच ठिकाणी त्याच्या छावणीवर संताजी घोरपडे यांनी छापा घालून बादशहाच्या डेऱ्याचे सोन्याचे कळस कापून नेले! आणि त्याचे स्वप्न भंगून टाकले. त्याचा भ्रम नष्ट केला.
 उत्तरोत्तर मराठयांचे हे आक्रमक तेज वाढतच गेले आणि ते राज्याला तसा कर्तबगार, समर्थ नेता नसताना, हे विशेष.

राजाराम
 शंभुछत्रपतींच्या नंतर राजाराम महाराज गादीवर आले. त्यांच्या अंगी तेज, कर्तृत्व काहीच नव्हते. पहिली दहा वर्षे रायगडावरच त्यांचे बालपण गेले. १६८० सालापासून १६८९ पर्यंत संभाजी महाराजांनी त्यांना नजरकैदेतच ठेवले होते. गादीवर आल्यावर लगेच ते जिंजीला गेले आणि तेथे १६९८ पर्यंत अडकून पडले होते. अशी वयाची २८ वर्षे गेली. १७०० साली त्यांना मृत्यू आला. कारकीर्द संपली.
 पण असे असले तरी राजाराम मनाने मोठे होते आणि त्या मोठेपणाचा स्वराज्याला मोठा उपयोग झाला. राज्याचा खरा वारस शाहू आहे; तो कैदेत आहे म्हणून आम्ही त्याचे राज्य चालवितो, अशी भूमिका प्रथमपासूनच त्यांनी घेतली होती. यामुळेच जिंजीला जाणे, तेथे राहणे व आठ वर्षांनी परत येणे या प्रसंगी त्यांना स्वामिनिष्ठ व कर्तबगार माणसे मिळाली.

नैतिक उंची
 राजधानी रायगडला मार्च १६८९ मध्ये वेढा पडला. त्या वेळी संभाजी महाराजांची राणी येसूबाई हिने सांगितले की राजारामांनी आता येथून बाहेर पडावे आणि पुढे योग्य वेळी आम्हांस सोडवून न्यावे. येसूबाईच्या या निःस्वार्थी, उदार विचारांमुळे सर्वांना धीर आला. तिने शाहूच राज्याचा मालक, हा आग्रह धरला नाही. यामुळे लोकांना ध्येयवादाची मोठी प्रेरणा मिळाली आणि रायगड ते जिंजी हा राजारामांचा प्रवास सुरक्षित पार पडला. गावोगावच्या ठाणेदारांना बादशहाने सक्त हुकूम पाठविले होते की राजारामाला पकडावे. पण त्यांना ते शक्य झाले नाही. एक सरदार किंवा हुजऱ्या जरी त्या वेळी फितूर झाला असता तरी धडगत नव्हती. पण तसे घडले नाही. सेनापती पानसंबळ, प्रल्हाद निराजी, निळो व बहिरो मोरेश्वर पिंगळे, खंडो बल्लाळ, मानसिंग मोरे, रुपाजी भोसले, बाजी व खंडोजी कदम, बहिरजी व मालोजी घोरपडे या सर्व मंडळींनी जिवास जीव देऊन, संघटित राहून, छत्रपतींना संभाळून नेले. मराठ्यांच्या नैतिक उंचीच्या दृष्टीने ही गोष्ट इतिहासात नोंद करून ठेवण्याजोगी आहे. ८-९ वर्षांनी राजाराम महाराज परत आले, त्या वेळीही त्याग, ध्येयनिष्ठा, स्वामिनिष्ठा या गुणांचा असाच प्रत्यय आला. औरंगजेबाविरुद्ध मराठ्यांनी ही एक मोठी लढाईच जिंकली, असे म्हणावे लागते.