पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
४७६
 

आणि वर वर्णिल्याप्रमाणे त्यांनी आक्रमकांशी जो मुकाबला केला तो पाहता तर, संशोधनाची गरजच नाही, असे वाटते.
 मराठयांच्या प्रतिकारामुळे मोगलांची दुर्दशा झाली याचा आणखी निर्णायक पुरावा म्हणजे त्यांच्यावरची मोहीम सोडून औरंगजेब विजापूर गोवळकोंड्याकडे वळला हा होय. तेथेही मराठ्यांनी त्या दोन शहांना साह्य करून वाचविण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा फारसा उपयोग न होता ती दोन्ही राज्ये बुडाली. ती दोन्ही इस्लामधर्मीय होती. पण ती शियापंथी होती आणि औरंगजेब कडवा सुनी होता. तो शियांचा फार द्वेष करी. या दोन शाह्या बुडविण्याचे ते एक महत्त्वाचे कारण होते.

आक्रमक पवित्रा
 १६८५ साली औरंगजेबाची पहिली मोहीम संपली आणि दोन वर्षांनी ती नव्या जोमाने सुरू झाली. या मधल्या काळात मराठे स्वस्थ बसले नव्हते. त्यांनी लहान मोठी, बऱ्हाणपूर, धरणगाव यासारखी, सतरा धनसंपन्न शहरे लुटली. १६८२ च्या ऑक्टोबरमध्ये संभाजी महाराजांनी भडोचवर म्हणजे महाराष्ट्राबाहेरही स्वारी करून विपुल संपत्ती लुटून आणली. विजापूर गोवळकोंड्याच्या पाडावानंतर मोगल कर्नाटकात शिरले. तो प्रांत या दोन शाह्यांच्या सत्तेखाली होता. तो पडल्यावर आता हा मुलूख सहज घेता येईल असे बादशहाला वाटत होते. पण तेथे दरजी राजे व केसो त्रिमल यांनी त्यांना तोंड देऊन तेथले मराठ्यांचे राज्य वाचविले. या कामी त्यांना कासमखानाशी मोठा सामना करावा लागला. तो करून शिवाय अर्काट, कांची, चिंगलपट ही ठाणी स्वारी करून त्यांनी हस्तगत केली. वांदिवॉश येथे तर इतका मोठा संग्राम झाला की मोगलांना सबुरीचे धोरण पत्करावे लागले.

फितुरी
 पण असे सर्व ठीक असूनही आता १६८६ सालानंतर मराठ्यांचा प्रतिकार ढिला पडू लागला आणि याचे मुख्य कारण म्हणजे फितुरी. प्रत्यक्ष युद्धात मराठे हरत नाहीत हे पाहून बादशहाने भेदनीतीचा अवलंब केला. त्याचे तसे प्रयत्न प्रारंभापासूनच चालू होते; आणि शिर्के, जेथे यांना वतने देऊन त्याने त्यांना वशही केले होते. पण पुढे हा प्रकार सर्रास सुरू झाला, तोच नियम झाला. १६८६ च्या अखेरीस साल्हेरचा किल्ला किल्लेदार असूजी याने मोठी मन्सब घेऊन मोगलांच्या स्वाधीन केला. रामसेजचा किल्ला असाच पडला. १६८८ च्या शेवटी हरीशगड, मदनगड, औंढा इ. सहा किल्ले मोगलांनी फितुरीने घेतले. १६८९ च्या प्रारंभी त्रिंबकगडचे किल्लेदार फितुर झाले. त्यांना मन्सब मिळाली. ठाणे जिह्यातील माहुली किल्ला द्वारकोजी या किल्लेदाराने लाच घेऊन मातबरखानाच्या स्वाधीन केला. बजाजी निंबाळकर १६८२ सालीच मोगलांकडे गेला होता. त्याचा मुलगा महादजी याला त्याची मनसब मिळाली.