पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
४७२
 


मोगल मोहीम
 शिवछत्रपती गेल्यानंतर दोन महिन्यांतच मोगलांच्या या प्रचंड मोहिमेला प्रारंभ झाला. औरंगजेब त्या वेळी राजपुतान्यात होता. त्याने तेथून खान बहादूरखान यास दक्षिणेत पाठविले आणि खानाने आल्याबरोबर जुलै १६८० मध्येच चांदवडजवळच्या अहिवंत या किल्ल्याला वेढा घातला. तेथून पुढे त्या परिसरात त्याचा संचार सतत चालूच होता. याच वेळी औरंगजेबाचा दुसरा सरदार रणमस्तखान हा बहाद्दूरखानाच्या मदतीला होताच. १६८१ च्या नोव्हेंबर महिन्यात शहाबुद्दिनखान याने दक्षिणेत येऊन साल्हेरच्या किल्ल्याला वेढा घातला. १६८१ च्या एप्रिल महिन्यात नाशिक जिल्ह्यात मोगलांच्या आक्रमक हालचाली सुरू झाल्या होत्या. चौथा एक सरदार हसन अल्लीखान याला १६८१ सालीच औरंगजेबाने रवाना केले होते. उत्तर कोकणात उतरून तो मुलूख काबीज करावा, असा त्याला हुकूम होता. १६८२ च्या मार्चमध्ये स्वतः बादशहा औरंगाबादेस येऊन पोचला. लगेच त्याने दिलेरखानास नगरकडे आणि शहाबुद्दिन यास नाशिककडे पाठविले. शहाबुद्दिनाने एप्रिलात रामशेज किल्ल्याला वेढा घातला आणि पुढे सरदारांच्या पुनः पुन्हा बैठकी घेऊन त्यांच्या वारंवार बदल्या करून औरंगजेबाने ही मोहीम अखंड चालू ठेवली.

सिद्दी, पोर्तुगीज
 अशा रीतीने सर्व महाराष्ट्रभर मोगलांनी आक्रमणास प्रारंभ केला होता. पण मागे सांगितल्याप्रमाणे मराठ्यांचा हा एकच शत्रू नव्हता. सिद्दी आणि पोर्तुगीज हे आणखी दोन प्रबळ शत्रू होते. त्यांनीही याच काळात मराठी मुलूख उद्ध्वस्त करण्यास प्रारंभ केला. सिद्दी कासम याने तर कोकणात अगदी अनर्थ चालविला होता. तो माणसे पकडून त्यांना गुलाम म्हणून विकी, हाती सापडलेल्यांच्या कत्तलीही करी; जाळपोळ, बलात्कार हा नित्याचाच प्रकार होता. १६८० च्या ऑगस्टपासूनच त्याने या विध्वंसाला प्रारंभ केला होता १६८१ च्या डिसेंबरात पनवेलपासून चौलपर्यंतच्या मुलखात त्याने धुमाकूळ घातला होता. पोर्तुगीजांचे आक्रमणही याच वेळी सुरू झाले होते. सिंधुदुर्गाशेजारचे जे अंजदीव बेट त्यावर संभाजी महाराजांनी किल्ला बांधण्याचे ठरवून तटबंदी सुरू केली. पण पोर्तुगीजांनी त्यावर स्वारी करून अंजदीव बेट हस्तगत केले. १६८२ मध्ये रणमस्तखान उत्तर कोकणात उतरला असता संभाजी महाराजांनी त्याचा कोंडमारा केला होता. पण त्याला पोर्तुगीजांनी धान्यसामग्री पोचविली. नाही तर खानावर कठीण प्रसंग आला होता. पुढच्या वर्षी जंगी तयारी करून पोर्तुगीजांनी स्वतःच आक्रमण करून महाराजांच्या फोंडा किल्ल्यास वेढा घातला (ऑक्टोबर १६८३).