पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४७१
स्वातंत्र्ययुद्ध
 


राजघराणे दुंभगले
 स्वातंत्र्ययुद्धाच्या पहिल्या नऊ वर्षाच्या काळात छत्रपती संभाजी हेच मराठ्यांचे नेते होते. त्यांच्या नेतृत्वात प्रारंभीच काही उणेपणा आला होता हे खरे. पण तरीही त्यांनी नऊ वर्षे जो पराक्रम केला तो त्यांना भूषणावह आहे. इ. स. १६७८ च्या अखेरीस शिवछत्रपती असतानाच ते दिलेरखानाला जाऊन मिळाले होते. त्यामुळे शिवछत्रपतींना मरणप्राय दुःख झाले. कारण तो त्यांच्या सर्व कार्याचा, तत्त्वज्ञानाचा, राष्ट्रधर्माचा दारुण पराभव होता. शिवाय त्यामुळे मंत्रिमंडळाचा संभाजीराजांवरचा विश्वास उडाला आणि सत्तेच्या शिखरस्थानातच दुही निर्माण झाली. संभाजी महाराजांना काही न कळवता सोयराबाई, मोरोपंत पिंगळे आणि अनाजी दत्तो यांनी कारस्थान रचून राजारामाला राज्याभिषेक केला. संभाजीनी हा सर्व बनाव मोडून काढला आणि विशेष कौतुकाची गोष्ट म्हणजे कटातल्या सर्व लोकांना उदार मनाने माफी देऊन पुन्हा स्वपदावर नेमून टाकले. पण सोयराबाई - पक्षाने पुन्हा कारस्थान रचले. पहिले कारस्थान कितीही क्षम्य किंवा समर्थनीय असले तरी दुसरे अगदी अक्षम्य होते. सोयराबाईला नसला तरी मंत्र्यांना हा विवेक असायला हवा होता. राजाराम प्रौढ असता, कर्तबगार असता, त्याच्या ठायी नेतृत्वाचे उत्तम गुण दिसत असते तर गोष्ट वेगळी होती. पण तसे काही नसताना, अनाजी दत्तो प्रभृतींनी आपल्या सामर्थ्याचा हिशेब न करता, पुन्हा कारस्थान रचले. यामुळे राजघराणे दुभंगले आणि महाराष्ट्र कायमचा दुभंगला.
 संभाजी महाराजांचा या कारस्थानामुळे तोल सुटला असला तर त्यांना दोष देता येणार नाही. तरीही एक गोष्ट खरीच आहे की मोठमोठे कर्ते पुरुष त्यांनी मारून टाकल्यामुळे, मराठ्यांचे सामर्थ्य खच्ची झाले. पण अशाही परिस्थितीत, औरंगजेबासारख्या मोठ्या शत्रूला त्यांनी आठ वर्षे खडे चारले, ही गोष्ट प्रारंभी म्हटल्याप्रमाणे, त्यांना भूषणावह आहे.

विविध शत्रू
 मोगल बादशहा औरंगजेब हा मराठ्यांचा आणि हिंदवी स्वराज्याचा सर्वात मोठा शत्रू. पण तो एकच शत्रू नव्हता. सिद्दी आणि पोर्तुगीज हेही आणखी शत्रु होते. आकारमानाने ते लहान होते, पण ते अत्यंत चिवट असून औरंगजेबाचा त्यांना सतत पाठिंबा होता. अशा या त्रिविध शत्रूंनी शिवछत्रपती कालावश होताच फार मोठी मोहीम मांडली. या मोहिमेचा थोडा तपशील समजला म्हणजे छत्रपती संभाजींच्या कर्तृत्वाची सम्यक कल्पना आपल्याला येईल व शिवछत्रपतींच्या युद्धविद्येचा वारसा त्यांनी कसा चालविला ते कळून येईल.