पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
४४६
 


गिरिदुर्ग
 शिवछत्रपतींच्या युद्धविद्येतले आणखी दोन महत्त्वाचे भाग म्हणजे त्यांचे गिरिदुर्ग, किल्ले आणि आरमार हे होत. त्यांचा विचार करून हे प्रकरण संपवू. स्वराज्याची स्थापना, त्याचे संरक्षण आणि त्याचा विस्तार या दृष्टीने रामचंद्रपंत अमात्य यांनी या दोहींचे उत्तम विवेचन केले आहे. त्यांच्या मते, 'गडकोट म्हणजे राज्याचे मूळ, गडकोट म्हणजे सैन्याचे बळ, गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी ! संपूर्ण राज्याचे सार म्हणजे दुर्ग; दुर्ग नसता मोकळा देश परचक्र येताच निराश्रय, प्रभाभग्न, उद्ध्वस्त होतो.' प्राचीन राज्यशास्त्रज्ञांनीही दुर्गाचे असेच महत्त्व सांगितले आहे. 'दुर्गाच्या आश्रयाने एक सशस्त्र मनुष्य शंभरांशी लढूशक तो. शंभर माणसे दहा हजारांशी लढू शकतात. यास्तव राजाने किल्ल्यांचा आश्रय करावा.' असे शुक्रनीतीत म्हटले आहे.

तीनशे साठ
 किल्ल्यांचे हे महत्त्व जाणूनच महाराजांनी त्यावर अमाप पैसा खर्च केला. आदिलशाही, निजामशाही, सुलतान सरदारांना जहागिरी देत. पण त्या जहागिरीतील किल्ले स्वतःच्या ताब्यात ठेवीत. यातील मर्म ध्यानात घेऊन महाराजांनी प्रथम सिंहगड, तोरणा, पुरंदर, हे किल्ले हस्तगत करण्याचा उद्योग आरंभिला; आणि कल्याण, भिवंडी, चिपळूण असा कोणताही नवा प्रदेश हाती आला की प्रथम ते तेथील किल्ले ताब्यात घेत, मोडलेले किल्ले पुन्हा बांधून काढीत आणि मोक्याची ठिकाणे हेरून, तेथे नवे किल्ले बांधीत. यावर इतका अमाप पैसा खर्च होई की मोरोपंत पेशवे, निराजीपंत मुजुमदार यांना सुद्धा चिंता वाटू लागली. तसे त्यांनी महाराजांना सांगितलेही. त्यावर महाराज म्हणाले, 'जे करवणे ते समजोनच करीत आहो. आपणांस धर्मस्थापना करणे व राज्य संपादणे. सर्वांस अन्न लावून शत्रुप्रवेश न होय ते किल्ल्यामुळे होते. दिल्लीद्रासारखा शत्रू उरावर आहे. तो आला तरी नवे जुने तीनशेसाठ किल्ले हजरीस आहेत. एकेक किल्ला वर्ष वर्ष लढला तरी तीनशे साठ वर्षे पाहिजेत.' (शिवदिग्विजय, पृ. १९०)

स्थापत्यकला
 चित्रगुप्ताने महाराजांच्या एकंदर किल्ल्यांची संख्या अशीच दिली आहे. डोंगरी दुर्ग २४०, मैदानी १०८ आणि जलदुर्ग १३. हे सर्व किल्ले दुर्भेद्य करून टाकण्यासाठी, अगणित पैसा तर अवश्य होताच; पण असामान्य असे शिल्पज्ञानही आवश्यक होते. आणि अत्यंत आश्चर्याची गोष्ट अशी की महाराज स्वतःच अगदी असामान्य असे स्थापत्यविशारद म्हणजे इंजिनियर होते, असे पाश्चात्यांनीच लिहून ठेवले आहे. जिंजी किल्ला घेतल्यावर त्याची नवी बांधणी करण्यासाठी त्यांना इंजिनियर हवे होते, ते त्यांनी