पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
४४४
 


लुटारू कोण ?
 हे उदात्त उद्दिष्ट ज्यांचे नव्हते त्यांनी जो द्रव्याचा अपहार केला, तो मात्र शुद्ध लुटारूपणा होता. पोर्तुगीज, इंग्रज, आदिलशाही, मोगल या सत्ता या कायमच असा लुटारूपणा करीत असत. आदिलशाही किंवा मोगल यांना सैन्य ठेवण्यासाठी इतका पैसा लागत नसे. कारण ते सरदारांना सरंजाम देत आणि त्यांना सैन्य उभारावयास सांगत. ते सरदार स्वतःच्याच प्रजेची कशी लूट करीत असत हे मागे सांगितलेच आहे. याचा अर्थ असा की या सत्ता परकी मुलखात तर लुटारूपणा करीतच, पण स्वतःच्या प्रजेलाही लुटून सैन्याचा खर्च भागवीत असत. या तुलनेने छत्रपतींनी सुरू केलेली चौथाईची पद्धत ही फारच सोज्ज्वळ व न्याय्य दिसते. याच दृष्टीने, प्राचीन राजनीति- शास्त्रज्ञांनी कोश या रीतीने समृद्ध करणे हा राजाचा धर्मच होय, असे म्हटले आहे.

रजपूत - तुलना
 महाराजांच्या रणनीतीचे स्वरूप वरील वर्णनावरून कळून येईल. रजपूत राणे- महाराणे यांनी जी युद्धपद्धती अवलंबिली होती, तिच्याशी तुलना करताना युद्धविद्येत शिवछत्रपतींनी केवढी क्रांती केली होती हे कळून येईल. रणात माघार घ्यावयाची नाही, शत्रूला पाठ दाखवावयाची नाही हे रजपूतांचे मुख्य तत्त्व. त्यामुळेच त्यांचा नाश झाला. कारण खिलजीच्या लष्कराइतके प्रचंड लष्कर त्यांना कधीच उभारता आले नाही. तेव्हा दर वेळी रणांगणात हजारो वीरांचा नाश, आणि हजारो रजपूत रमणींचा जोहार, हाच तेथे नियम होऊन बसला. महाराजांनी ती धर्मयुद्धपद्धती अवलंबिली असती तर त्यांना कधीच विजय मिळाला नसता. मायावी शत्रूशी जे मायावी पद्धतीने वागत नाहीत ते मूढ लोक पराभूत होतात असे, भारवीने म्हटले आहे. कपटनीती, कूटयुद्ध यांचा आश्रय केल्यावाचून विजय मिळत नसतो, असे श्रीकृष्णांनी अनेक वेळा सांगितले आहे. रजपुतांनी या प्राचीन तत्त्वाकडे, नसत्या मोठेपणाच्या कल्पनेमुळे, दुर्लक्ष केले आणि स्वतःचा आणि भारताचा नाश करून घेतला.

पडत्या प्रसंगी
 रजपूत ठकाशी कधी ठक झाले नाहीत आणि पडता प्रसंग ओळखून शरणागती पत्करावी, हेही त्यांनी केले नाही. जयसिंगाची स्वारी आली तेव्हा महाराजांनी रजपुती अभिमान धरून रणात धारातीर्थी आत्मबलिदान केले असते तर ते हिंदुधर्म, हिंदुसंस्कृती व हिंदुसमाज यांचेच बलिदान ठरले असते. रजपुतांच्या तसल्या अभिमानामुळे ती वेळ आलीच होती. सर्व राजस्थान परतंत्र झाला, प्रत्येक रजपूत राजाला मोगलांचा चाकर व्हावे लागले आणि आपल्या मुलीबाळी मोगलांना अर्पण कराव्या लागल्या. छत्रपतींनी श्रीकृष्णप्रणीत युद्धनीतीचा अवलंब केला नसता तर महाराष्ट्राच्या, आणि नंतर सर्व हिंदुस्थानाच्या कपाळी हेच आले असते.