पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४२९
'मऱ्हाष्ट्र राज्य'
 


विषाराचा नाश
 जातिभेद, वर्णभेद, अस्पृश्यता हा भारताला मिळालेला शाप आहे. तो आहे तोपर्यंत हिंदुसमाज संघटित होणे शक्य नाही. हा रोग सर्वस्वी नष्ट करणे अजून कोणालाही शक्य झाले नाही. पण प्रत्येक युगात त्यातला विषार नष्ट करण्याचा प्रयत्न थोर पुरुष करीत आले आहेत. संतांनी धार्मिक क्षेत्रात या विषमतेला आळा घालण्याचा प्रयत्न केला. छत्रपतींनी राजकीय क्षेत्रात तसाच प्रयत्न केला. त्याला यश आले. म्हणूनच येथे राष्ट्रीय भावना रुजू शकली व सामान्य लोकांना गुणविकासाची संधी मिळून त्यांचे कर्तृत्व फुलारून आले. नव्या शक्ती, नवे सामर्थ्य, नवे तेज उदयास येणे हे क्रांतीचे एक फल म्हणून सांगितले जाते. महाराष्ट्रात तशी क्रांती छत्रपतींनी निश्चित घडविली होती. मराठा, ब्राह्मण, प्रभू, न्हावी, कोळी, भंडारी, कातकरी, हेटकरी सर्व जातींतून सर्व प्रकारचे कर्तृत्व बहरून आले. मायनाक भंडारी हा आरमाराचा अधिपती होऊ शकला, सामान्य कुणबी सरनोबत पदाला जाऊ शकला, याचा दुसरा अर्थ काय होतो ?

कुणब्याची चिंता
 यासाठीच लोकजागृती, लोकसंघटना हे उद्दिष्ट महाराजांनी सतत डोळ्यांपुढे ठेविले होते. वर सांगितलेली महाराजांची पत्रे पाहिली तर अहोरात्र ते लोकांची चिंता कशी वहात असत ते कळून येते. चिपळूणच्या लष्करी तळावरील जुमलेदार, हवालदार यांना लिहिलेले वरील पत्रच पाहा. परदेशातून लष्कर संचारू लागले की लोकांवर जुलूम व्हावयाचा हे ठरलेलेच होते. लोकांची उभी पिके कापून नेणे, त्यांच्या घरांतून दाणावैरण लुटून नेणे, माल घेऊन पैसे न देणे, हे नित्याचेच प्रकार होते. याविषयी महाराजांनी फार कडक ताकीद वरील पत्रात दिली आहे. ते म्हणतात, 'जे कुणबी घर करून जीव मात्र घेऊन राहिले आहेत तेही जाऊ लागतील, म्हणजे त्यांस ऐसे होईल की मोगल मुलकात आले त्याहूनही अधिक तुम्ही ! तेव्हा शिपाई हो, बहुत यादी करून वर्तणूक करणे. ज्यास जे पाहिजे ते विकावया येईल ते रास विकत घ्यावे. कोण्हावरी जुलूम ज्याजती करावयाची गरज नाही.' दुसऱ्या एका पत्रात, शायिस्तेखानाचे लष्कर सर्वत्र फिरत असताना, अधिकाऱ्यांनी अहोरात्र फिरत राहून रयतेचा संभाळ करण्याविषयी बजावले आहे. 'जेथे गनिमाचा आजार (त्रास) पहुचेना ऐशा जागियासी त्यास पाठविणे. गावाचा गाव हिंडून रातीचा दिवस करून लोकांना घाटाखाली जागा असेल तेथे पाठविणे. या कामात एक घडीचा दिरंग न करणे.'

मराठा तेवढा
 कुणबी, शेतकरी यांची अशी सतत चिंता वाहिली जात असल्यामुळेच, हे आपले राज्य