पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
१८
 

 आभीरादींच्या भाषांना अपभ्रंश म्हणतात असे दण्डी म्हणतो. डॉ. पां. दा. गुणे यांचे, शक, पल्लव, आभीर इ. रानटी टोळ्या इ. सनाच्या प्रारंभी भारतात आल्या व त्या आर्यसमाजात मिसळून गेल्यामुळे येथल्या मूळच्या भाषा व त्यांच्या भाषा यांचे मिश्रण होऊन येथे निरनिराळ्या अपभ्रंश भाषा निर्माण झाल्या असे मत असल्याचे वर सांगितलेच आहे. अपभ्रंश भाषांची ही उत्पत्ती त्यांच्या मते इ. सनाच्या ४ थ्या शतकात झाली. 'भविसयत्तकहा' या धनपालाच्या अपभ्रंश ग्रंथाला त्यांनी जी प्रस्तावना जोडली आहे तिच्यात अपभ्रंश भाषांचा त्यांनी सविस्तर विचार केला आहे. आणि विविधज्ञानविस्तारातील लेखातले मत तेथे मांडले आहे. याच लेखात त्यांनी 'महाराष्ट्री अपभ्रंश ' ही मराठीची प्रत्यक्ष जननी होय असे मत मांडून अपभ्रंशापासून मराठीने कोणते विशेष उचलले ते सविस्तर सांगून भरपूर प्रमाणांनी आपले मत सिद्ध केले आहे. त्यांतील काही महत्त्वाची प्रमाणे पुढे देतो. १. भूतकाळ- वाचकरूपे भूतकालवाचक धातुसाधितांवरून करण्याचा प्रघात. २. विध्यर्थाची रूपे कर्मणिधातुसाधितांवरून करण्याची चाल. ३. क्रियातिपत्ती हा 'ल'कारही वर्तमानकालवाचक धातुसाधितांवरून साधण्याची पद्धत. ४. वर्तमानकालवाचक धातुसाधित भूतकाल दर्शविण्यासाठी वापरण्याची रीत - हे सर्व मराठीने अपभ्रंशापासून घेतले आहे. ( विविधज्ञानविस्तार – जून १९२२ - वर्ष ५३ ) त्याचप्रमाणे १. प्रथमाविभक्ती - एक- वचनी उ, ओ प्रत्यय लावणे अगर उभयवचनी व द्वितीयेतही तो गाळणे, हा प्रकार, २. ( षष्ठी विभक्ती विशेषणरूप बनवून तिला तद्धित प्रत्यय जोडण्याचा प्रकार व ३. इतर काही विभक्ती नवे प्रत्यय लावून बनविण्याचा प्रकार - (तृतीया व पंचमी), हे सर्व प्रकार मराठीने अपभ्रंशातून स्वीकारले आहेत.
 संकृतावरून महाराष्ट्री प्राकृत, तिच्यापासूनच महाराष्ट्री अपभ्रंश आणि या अपभ्रंशा- पासून मराठी - ही परंपरा अशा रीतीने निर्विवाद सिद्ध होते असे दिसून येईल.

जैन महाकवी पुष्पदन्त
 महाराष्ट्री अपभ्रंश ही भाषा चौथ्या शतकाच्या आरंभी उत्पन्न झाली असली तरी तिला विकसित होऊन ती वाङ्मययोग्य होण्यास ४/५ शे वर्षे लागली असे दिसते. 'महापुराण', जसहरचरिऊ ', 'णायकुमारचरिऊ', हे पुष्पदंताचे ग्रंथ व 'भविसयत्तकडा', 'करकंडचरिऊ', 'पऊमचरिऊ', 'सावयधम्मदाहो' इ. आज उपलब्ध असलेले सर्व अपभ्रंश ग्रंथ हे दहाव्या अकराव्या शतकातील आहेत. पुष्पदन्त हा अपभ्रंश-साहित्यातील सर्वश्रेष्ठ कवी मानला जातो. हा कवी महाराष्ट्रातील मान्यखेटचा राष्ट्रकूट राजा कृष्ण याचा अमात्य भरत याच्या आश्रयाला होता. भरताच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र नन्न याने याला आश्रय दिला. पुष्पदन्त प्रथम शैव असून पुढे त्याने जैन धर्माचा आश्रय केला. त्याने वरील तीनही ग्रंथ जैन झाल्यानंतर लिहिलेले आहेत. पण शेवटपर्यंत तो महाराष्ट्रातच होता यात वाद नाही.