पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१७
महाराष्ट्राची पृथगात्मता
 

विचारावर आपल्या ' काव्यादर्श' या ग्रंथात शिक्कामोर्तबही करून टाकले आहे. त्याचे पुढील वचन सुप्रसिद्ध आहे.
  महाराष्ट्राश्रयां भाषां प्रकृष्टं प्राकृतं विदुः ।
  सागरः सूक्तिरत्नानां सेतुबंधादि यन्मयम् ॥
 महाराष्ट्रात प्रचलित असलेली भाषा ही पंडितांच्या मते सर्वात श्रेष्ठ प्राकृत भाष होय. कारण त्या भाषेत सेतुबंधासारखे सूक्तिरत्नांचे सागरच्या सागर आहेत. 'सेतुबंध ' हे महाराष्ट्रीतील सुप्रसिद्ध काव्य होते हे वर सांगितलेच आहे. तेव्हा महाराष्ट्राची महाराष्ट्री ही भाषा असून ती अत्यंत संपन्न होती असा दण्डी कवीचाही अभिप्राय होता असे दिसते.

अपभ्रंशापासून मराठी
 वर जिचे वर्णन केले त्या महाराष्ट्रीपासूनच मराठीची उत्पत्ती झाली असे मत बरेच दिवस रूढ होते. आजही डॉ. ए. एम. घाटगे यांच्यासारख्या पंडिताचे तेच मत आहे. डॉ. भांडारकर, स्टेन कोनौ, ग्रियरसन या जुन्या पंडितांचे निश्चितच होते. पण अलीकडे सुमारे चाळीसपन्नास वर्षापूर्वी अपभ्रंश साहित्याचा शोध लागल्यामुळे या मतात जरा बदल झाला आहे. तो असा की महाराष्ट्रीपासूनच मराठीची उत्पत्ती झाली हे जरी खरे असले तरी ती मराठीची साक्षात माता नसून मातामही होय. महाराष्ट्री प्राकृतापासून 'महाराष्ट्री अपभ्रंश ' ही भाषा निर्माण झाली व तिच्यापासून मराठीची उत्पत्ती झाली असे नवे मत आहे. कुलगुरू चिंतामणराव वैद्य, डॉ. पां. दा. गुणे, डॉ. शं. गो. तुळपुळे, डॉ. वि. भि. कोलते यांनी या मताचा पुरस्कार केला आहे. या पंडितांनी आपल्या मताच्या सिद्धयर्थ जो भरभक्कम पुरावा उभा केला आहे त्याकडे पाहता, हेच मत सर्वमान्य होईल असे वाटते.
 येथे 'अपभ्रंश' हा शब्द वापरला आहे तो महाराष्ट्रात महाराष्ट्री-प्राकृत या भाषेपासून उद्भवलेली मराठीची पूर्वगामी अशी एक स्वतंत्र भाषा या अर्थाने वापरला आहे, हे ध्यानात ठेविले पाहिजे. कारण जुन्या काळी त्याला याहून इतर अनेक अर्थ होते. संस्कृतापासून झालेली कोणतीही विकृती ही पतंजलीच्या मते अपभ्रंश होय. दण्डीने तोच अभिप्राय दिला आहे. तो म्हणतो, आभीरादी लोकांच्या भाषेला काव्यात अपभ्रंश म्हणतात; पण शास्त्रात मात्र संस्कृतापासून भिन्न ते सर्व अपभ्रंश होत. भामहाच्या मते संस्कृत व प्राकृत यांहून अपभ्रंश निराळी आहे. संस्कृत, प्राकृत, मागधी, शौरसेनी, पैशाची व अपभ्रंश अशा सहा भाषा आहेत असे चंड, रुद्रट, हेमचंद्र यांचे मत आहे. त्यात रुद्रटाच्या मते अपभ्रंशाचे देशपरत्वे अनेक प्रकार आहेत. रुद्रटाने अपभ्रंश हा शब्द सामान्य अर्थी वापरला आहे; आणि सध्याच्या पंडितांना तो मान्य आहे. म्हणून विवक्षित देशातील भाषेचा उल्लेख करताना ते शौरसेनी अपभ्रंश, मागधी अपभ्रंश, महाराष्ट्री अपभ्रंश असा निर्देश करतात. येथील विवेचनात शेवटचा अर्थ अभिप्रेत आहे हे वर सांगितलेच आहे.