पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४२१
'मऱ्हाष्ट्र राज्य'
 


व्याख्या
 राष्ट्र ही अर्वाचीन कल्पना आहे. चौदाव्या पंधराव्या शतकात पश्चिम युरोपात तिचा उदय झाला. त्या वेळी व त्यानंतर अनेक पंडितांनी राष्ट्राची व्याख्या केली आहे. एका भूमीवरील निष्ठा, एका समाईक प्राचीन परंपरेचा अभिमान, एक भाषा, एकवंशीयत्वाची जाणीव, सर्वांनी मिळून केलेल्या पराक्रमांच्या व भोगलेल्या आपत्तींच्या स्मृती व स्वतंत्र सार्वभौम राजसत्ता या गुणांनी इतरांपासून भिन्न झालेला व अंतरात एकात्म झालेला समाज - असा त्या भिन्नभिन्न पंडितांनी केलेल्या व्याख्यांचा सारार्थ आहे. अशा तऱ्हेची राष्ट्रसंघटना जगात कोणत्याच देशात त्या आधी निर्माण झालेली नव्हती. प्राचीन भारतीयांचा तसा काहीसा प्रयत्न होता. अखिल भारत हा एक देश आहे ही भावना त्यांनी निर्माण केली होती. रामायण, महाभारत व पुराणे यांनी सर्व भारतीयांची एक परंपरा घडविली होती हे खरे. पण हे सर्व ग्रांथिक व वैचारिक पातळीवरचे होते. अखिल भारतीय समाजाने– सिंध ते आसाम आणि काश्मीर ते कन्याकुमारी येथील जनतेने- सहभागी होऊन काही पराक्रम केला, सहकार्याने काही महत्कार्य साधले, किंवा समान आपत्तींना तोंड देऊन, त्यांचे दुःख सर्वांनी भोगले असे कधीच घडले नाही. प्रादेशिक पातळीवर अशी भावना कधी निर्माण झाली नाही. महाराष्ट्रापुरते बोलावयाचे तर यादवांचे राज्य सर्व महाराष्ट्रावर होते. पण आपण सर्व मराठे आहो, आपण मराठा तितुका मेळविला पहिजे, आमची एक स्वतंत्र प्राचीन परंपरा आहे, हे राज्य आहे ते मराठ्यांचे राज्य असून त्याच्या उत्कर्षापकर्षाची चिंता वाहणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, अशा प्रकारची भावना यादवांच्या प्रजाजनात कधीही निर्माण झालेली नव्हती. मागे वापरलेल्या परिभाषेत बोलावयाचे तर या प्रजाजनांचे नागरिकांत रूपांतर झाले नव्हते. हे जे घडलेले नव्हते ते शिवछत्रपतींनी घडविले.

नवी अस्मिता
 आम्ही मराठे व आमचा देश महाराष्ट्र ही नवी अस्मिता शिवछत्रपतींनी या देशात निर्माण केली. कान्होची जेधे छत्रपतींच्या सहवासात राहिले होते. त्यामुळे त्यांना या नव्या अस्मितेचा बोध झाला होता. म्हणूनच मावळच्या देशमुखांना त्यांनी सांगितले की 'हे मऱ्हाष्ट्र राज्य' आहे. शेवटपर्यंत मराठ्यांना ही जाणीव कायम होती. छत्रपती राजाराम, शंकराजी नारायण सचीव, अनाजी जनार्दन सुभेदार, रामचंद्रपंत अमात्य, महादजी सामराज नामजाद व कारकून यांचे उतारे मागील एका प्रकरणात दिले आहेत. सर्वाचे उद्गार आहेत की हे महाराष्ट्र राज्य, हे मऱ्हाटे राज्य, हे देवाब्राह्मणांचे राज्य आहे. मराठी साम्राज्याच्या अखेरपर्यंत 'हे मऱ्हाष्ट्र राज्य आहे' याचा विसर कोणाला पडला नव्हता.
 सभासदाने आवर्जून पुन्हा पुनः म्हटले आहे की 'मऱ्हाठा पातशहा एवढा