Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
४२०
 

या सर्व समाजाला मराठा म्हणून एक अस्मिता निर्माण झाली, हा तिसरा घटक होय.
 यदुनाथ सरकार यांनी महाराजांच्या बद्दल असेच धन्योद्गार काढले आहेत. ते म्हणतात, 'शिवाजी महाराजांपूर्वी मराठे हे अनेक दक्षिणी शाह्यांमधून पसरले होते. त्यांना एकत्र आणून त्यांनी त्यांचे एक प्रबळ राष्ट्र बनविले. मोगल, विजापूर, पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्दी यांच्या प्रतिकाराला न जुमानता त्यांनी ही गोष्ट घडवून आणली. मध्ययुगीन भारतात कोणाही हिंदूने अशी कर्तबगारी दाखविली नव्हती. विजापूर व दिल्ली यांच्या सत्तेला आव्हान देणारा शिवाजी हा पहिलाच वीर पुरुष होय. हिंदुसमाज राष्ट्र निर्माण करू शकतो, राज्य स्थापन करू शकतो, विद्या, कला यांना उत्तेजन देऊ शकतो, व्यापार, उदीम यांची भरभराट करू शकतो, या गोष्टी शिवाजी महाराजांनी सिद्ध करून दाखविल्या... त्यांच्या राज्यात सर्व धर्मांना समान वागणूक मिळाली, स्त्रियांचे रक्षण झाले, आणि प्रत्येक जातीच्या माणसास पुढे येण्यास वाव मिळाला. भारताची जनता अठरापगड जातीची आहे. महाराजांचे धोरण हेच अशा देशासाठी आवश्यक असलेले आदर्श धोरण होय.' (शिवाजी आणि त्याचा काल, सहावी आवृत्ती, पृ. ३८९, ३८५)
 सेतुमाधवराव पगडी यांनी 'छत्रपती शिवाजी' या आपल्या चरित्रग्रंथात असाच भावार्थ सांगितला आहे. ते म्हणतात, 'शिवाजी हा राष्ट्रपुरुष होता. त्याच्या आधी मराठ्यांमध्ये राष्ट्रभावना मुळीच नव्हती. हा समाज जातिभेद गुस्त आणि वतनासक्त असा होता. छत्रपतींनी आपल्या वाणीने व कृतीने या लोकांना ध्येयवाद शिकविला.' (पृ. २८, २९) 'छत्रपतींनी मराठ्यांच्या सुप्त शक्ती जागृत केल्या. त्यांनी त्यांच्या ठायी आत्मविश्वास निर्माण केला. हेकट, धर्मांध अशा परकी शत्रूशी लढून, आपल्या उच्च नीतिमूल्यांची जपणूक करण्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याइतके उदात्त असे काहीच नाही, ही शिकवण त्यांनी समाजाला दिली. त्यांचे सेनादल सर्व जनसामान्यातून उभारलेले असून त्याच्या रोमरोमात राष्ट्रीयभावना भिनलेली होती. त्यांचे मंत्री, त्यांचे वकील, त्यांचे सेनापती, त्यांचे सर्व अधिकारी हे जनतेतून आलेले होते. असे हे छत्रपतींचे राष्ट्र राष्ट्रधर्मावर अधिष्ठित होते. न्याय, नीती, सहिष्णुता, प्रजापालन हा त्यांचा धर्म होता. यामुळेच भारताच्या महापुरुषांत छत्रपतींना अग्रमालिकेत स्थान मिळालेले आहे.' (पृ. ५२-५३)
 शिवछत्रपतींनी महाराष्ट्रात राष्ट्र निर्माण केले म्हणजे काय केले हे पाहण्यासाठी आपण सरदेसाई, यदुनाथ सरकार व सेतुमाधवराव पगडी या पंडितांनी त्यांच्या कार्याचे केलेले वर्णन पाहिले. आता प्रत्यक्ष घडलेल्या इतिहासाच्या आधारे काही मीमांसा करू.