पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
३८६
 

अशा तऱ्हेने हिंदुस्थान सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत अगदी खग्रास झाला होता.

आमूलाग्र क्रांती
 शिवाजी राजे अकराव्या वर्षी बंगरुळहून महाराष्ट्रात आले आणि पुण्याच्या परिसरात राहून प्रथम दादोजी कोंडदेवांच्या हाताखाली आणि नंतर स्वतंत्रपणे आपल्या जहागिरीची व्यवस्था पाहू लागले. त्या वेळी भोवतालची परिस्थिती अशी होती : सगळीकडे अंधकार होता. खग्रास होता. आशेचा किरणही कोठे दिसत नव्हता. ते या परिस्थितीचे जेव्हा निरीक्षण करू लागले, अवलोकन करू लागले, आपले गुरुजी दादोजी कोंडदेव, शामराज नीलकंठ, सोनोपंत डबीर इ. इतर वडीलधारी माणसे, कंक, पासलकर, जेधे इ. सवंगडी यांच्याशी चर्चा विचारविनिमय करू लागले, महाभारत, रामायण, गीता यांचे श्रवण करू लागले, समर्थ रामदासस्वामी यांच्या कार्याची दिशा त्यांच्या ध्यानात येऊ लागली, त्या वेळी त्यांच्या बुद्धीचा एक निश्चय झाला की मराठी जीवनाच्या सर्व क्षेत्रांत आमूलाग्र क्रांती केल्यावाचून हिंदूंना उत्कर्षाची कसलीही आशा धरता येणार नाही. शिवछत्रपती हे काही ग्रंथकार तत्त्ववेत्ते म्हणून प्रसिद्ध नाहीत. त्यांनी स्वतः एकही ग्रंथ लिहिला नाही. पण त्यांनी जे प्रत्यक्ष कार्य केले त्यावरून, त्यांची जी काही पत्रे उपलब्ध आहेत त्यावरून शिवभारतकारांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे जे वर्णन केले आहे त्यावरून, समर्थांनी त्यांचा जो गौरव केला आहे त्यावरून, आणि तत्कालीन पत्रव्यवहार, बखरी इ. साधनांवरून पाहता असे निश्चित म्हणता येते की क्रांतीच्या तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने पाहता हा महापुरुप तत्ववेत्त्यांचाही तत्त्ववेत्ता होता. क्रांतीचे तत्त्वज्ञान, काही सिद्धान्त, प्रारंभीच निश्चित केल्यावाचून त्यांनी केलेले कार्य त्यांना करताच आले नसते. वर सांगितलेल्या साधनांच्या आधारे, ते तत्त्वज्ञान पाहत पाहत, त्याशी त्यांच्या कार्याची संगती लावीत लावीत, छत्रपतींच्या चरित्राचे विवेचन आपल्याला करावयाचे आहे.

धर्मक्रांती
 या दृष्टीने शिवछत्रपतींनी केलेल्या धर्मक्षेत्रातल्या क्रांतीचा प्रथम विचार करू. मनावर पुरातन काळापासून धर्माचीच सत्ता चालत आलेली आहे. आणि विज्ञानयुगानंतर आजही यात फारसा बदल झालेला नाही. समाजाचा उत्कर्ष करील तो धर्म, ज्याने धारण होते, संरक्षण होते तो धर्म, ज्याने लोकयात्रा संपन्न होते तो धर्म, अशा प्राचीनांनी धर्माच्या व्याख्या केलेल्या आहेत. त्या पाहता आजही क्रांतिकारकांना प्रथम धार्मिक तत्त्वांचाच विचार करावा लागतो, असे दिसून येईल. मग छत्रपतींच्या काळी काय असेल हे सांगण्याची गरज नाही. त्यामुळेच लोकांच्या मनातील धर्मकल्पना समूळ पालटल्यावाचून हिंदुसमाजाचा उत्कर्ष होणे शक्य नाही, अनसे ठरवू महाराजांनी तेथूनच प्रारंभ केला.