पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


१९.
मराठा काल
 



शिवछत्रपतींची स्वधर्मसाधना
 महाराष्ट्रसंस्कृतीचा इतिहास पाहताना येथवर आपण बहामनी कालातील संस्कृतीचे स्वरूप पाहिले. प्रथम बहामनी सुलतानाची सत्ता कशी होती ते आपण न्याहाळले. नंतर त्या काळचे नेते जे मराठा सरदार आणि शास्त्रीपंडित यांच्या नेतृत्वाचे आणि कर्तृत्वाचे परीक्षण केले आणि नंतर भागवतधर्माचे प्रणेते ज्ञानेश्वर, नामदेव- एकनाथ व तुकाराम हे संत आणि महाराष्ट्रधर्माचे प्रणेते समर्थ रामदास यांच्या कार्याचे विवेचन केले. आता मराठाकालाचे - या कालखंडातील संस्कृतीचे स्वरूप पहावयाचे आहे. इ. स. १६४५ ते इ. स. १८०० असा सुमारे दीडशे वर्षांचा हा काळ आहे. १६४५-४६ च्या सुमारास प्रथम श्री शिवछत्रपतींनी तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले आणि या 'स्वराज्याचे पुढे मराठा साम्राज्य होणार आहे' अशा भावार्थाची प्रतिपच्चंद्ररेखेव वर्धिष्णू अशी मुद्राही त्यांनी करून घेतली. तेथपासून इ. स. १७९५ पर्यंत म्हणजे खर्ड्याच्या विजयापर्यंत हे साम्राज्य वर्धिष्णू होते. हा एवढा काल म्हणजे मराठा काल होय. या कालातल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचे आता समीक्षण करावयाचे आहे.

खग्रास
 शिवछत्रपतींनी स्वराज्याचा महासंकल्प केला आणि हजारो मावळ्यांसह स्वरा-