पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६९
स्वराज्य आणि स्वधर्म
 

प्रत्यक्षात ती राजकीय संघटना होती. कारण मुस्लिम सत्तेचा प्रतिकार करण्याची शक्ती समर्थांना जागृत करावयाची होती.

प्रचंड योजना
 समर्थांनी भारतात एकंदर ११०० मठ स्थापिले होते असे म्हणतात. हे अनेकांच्या मते शंकास्पद आहे. पण महाराष्ट्रात ११० मठ स्थापिले होते याविषयी वाद नाही. डोमगाव येथे कल्याणस्वामींचा मठ होता. कण्हेरी- वासुदेवस्वामी, शिरगाव- दत्तात्रय, चाफळ- भास्कर, नगरप्रांत देवदास, तिसगाव- दिनकर, इंदूरबोधन- उद्धव, पाली- रंगमूर्ती इत्यादी मठांची आणि मठपतींची यादी उपलब्ध आहे. प्रा. श्री. म. माटे यांनी 'रामदास- स्वामींचे प्रपंचविज्ञान' या ग्रंथात ती दिली आहे. ही यादी आणि भारतातील इतर प्रांतातील मठांची यादी : सुरत- जनार्दन, काशी- रामचंद्र, कांची- बगवंत, हरिद्वार- जयकृष्ण, अयोध्या- रामकृष्ण (समर्थप्रताप, गिरिधरस्वामी) पाहिली म्हणजे अखिल भारतभर मोगली सत्तेविरुद्ध लोकजागृती करण्याची व लोकांत राष्ट्रभावना निर्माण करण्याची प्रचंड योजना समर्थांनी आखली होती, असे स्पष्ट दिसून येते.

जाणतेपण
 राष्ट्रभावना ही फार मोठी क्रांती आहे. समाजाच्या उत्कर्षापकर्षाची जबाबदारी माझ्या शिरावर प्रत्येक व्यक्तीच्या शिरावर आहे ही जाणीव, हे तिचे पहिले लक्षण होय. पश्चिम युरोपातही ती अजून सार्वत्रिक झालेली नव्हती. हिंदुस्थानात तर ती कोणाच्या स्वप्नातही नव्हती. अशी ही राष्ट्रनिष्ठा समर्थांना येथे निर्मावयाची होती. त्यासाठी लोकशिक्षण हा त्यांचा मार्ग होता. कारण ही क्रांती प्रामुख्याने वैचारिक क्रांती असते. म्हणूनच समर्थ म्हणत, 'बहुत लोक मेळवावे, एक विचारे भरावे.' सर्वज्ञ संग निरूपण या समासात (दास. १८-२) ते म्हणतात, 'नेणतेपण जाले ते जाले' -इतके दिवस अडाणी राहिलो- 'जाले ते होऊनि गेले', पण 'आता तरी जाणतेपणे वर्तले पाहिजे नेमस्त.' हा जाणतेपणा कसा येईल ? 'जाणत्याच्या कथा सिकाव्या । जाणत्याच्या युक्ती समजाव्या ॥ जाणत्याचे पेच जाणावे, जाणत्याचे जाणावे प्रसंग, जाणत्याचा साक्षेप घ्यावा, तर्क जाणावा, जाणत्याचा उल्लेख (मर्म) समजावा, न बोलताचि ॥ जाणत्याचे राजकारण, जाणत्याचे धूर्तपण, त्याच्या नाना कल्पना, याची विवंचना, समजोनि घ्यावी ॥
 समाजात असा जाणतेपणा यावा, लोकांना राजकारण कळावे म्हणूनच महंतांना ते सारखे सांगतात, 'जितुके काही आपणासि ठावे, तितुके हळूहळू सिकवावे, शहाणे करूनि सोडावे, सकळ जन ॥' 'संकेते लोक वेधावा, येवून येक बोधावा ॥' 'मुलाचे चालीने चालावे, मुलाच्या मनोगते बोलावे, तैसे जनासि सिकवावे, हळूहळू ॥' आणि अशी सिकवणे देऊन करावयाचे काय ? 'रामकथा ब्रह्मांड भेदूनि पैलाड न्यावी ॥'

 २४