पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
३७०
 


रामकथा
 रामकथा ब्रह्मांड भेदूनि नेण्याला त्या काळी विशेष अर्थ होता. समर्थांनी चाफळला आल्यावर गावोगावी मारुतीची देवळे उभी करण्याचा व रामनवमीचा उत्सव सुरू करण्याचा उपक्रम केला होता. हे मुस्लिम सत्तेला एक आव्हानच होते. इंग्रजांचे राज्य असताना देखील भारतातले मुस्लिम हे गणेशोत्सव, दुर्गा उत्सव यांवर हल्ले करून मूर्ती फोडण्याचा पराक्रम करीत असत. मग त्यांचीच सत्ता असताना ते काय करीत असतील, हे सहज समजण्याजोगे आहे. अगोदरच पूर्वीची मंदिरे पाडून त्यांच्या मशिदी करण्याचा सपाटा त्यांनी लावला होता. मग नवीन मंदिरे व उत्सव यांना ते विरोध करणार हे उघडच होते. हा विरोध मोडून काढण्याचे शिक्षण लोकांना देऊन त्यांच्या ठायी थोडे धैर्य, थोडा ताठरपणा, थोडी प्रतिकारशक्ती चेतवावी हा समर्थांचा हेतू होता. आणि मसूर, माहुली, बिदर या ठिकाणी ते त्यांनी घडवून आणले असे समर्थप्रताप व दासविश्रमधाम या ग्रंथांतील वर्णनांवरून दिसून येते. बिदरला राम, मसूरला मुसळ राम आणि माहुलीला उद्भव असे त्यांचे महंत होते. त्यांनी राम आणि मारुती यांचे उत्सव सुरू करताच स्थानिक मुस्लिम अधिकारी खवळले व त्यांनी या महंतांना छळण्यास सुरुवात केली. त्या वेळी समर्थांनी स्वतः लक्ष घालून या अधिकाऱ्यांना अद्दल घडविली. वरील ग्रंथांत या प्रसंगांचे वर्णन जुन्या संतचरित्रातल्यासारखे केले आहे. मारुतीने व समर्थांनी गुप्तरूपाने त्यांना शिक्षा केली, त्यामुळे ते घाबरून गेले, असे तेथे वर्णन आहे. पण 'परस्परेचि प्रत्ययो प्रचीतीस आणावा' या धोरणाप्रमाणे हे कार्य गुप्तरूपाने केले असावे, असे वाटते. डॉ. पेंडसे यांनी त्याचा खरा अर्थ विशद करून सांगितला आहे (राजगुरु समर्थ रामदास, पृ. ३२, ७६). यावरून मठ स्थापून या प्रकारचीही 'शिकवण' लोकांना देण्याची व्यवस्था समर्थांनी केली होती, असे दिसते. अर्थात याच्यामागे मुख्य शिकवण आहे ती मानसिक परिवर्तनाचीच आहे. आपल्या धर्माचे रक्षण आपण केले पाहिजे, त्यासाठी परकीय जुलमी सत्तेशी लढा दिला पाहिजे, त्यासाठी सर्वस्व त्यागाची तयारी असली पाहिजे, असा या शिकवणीचा सारार्थ होता.

लोकसेवा
 हे जे लोकशिक्षणाचे कार्य करावयाचे त्याचे मार्ग कोणते ? कीर्तने, प्रवचने, पुराणे हे सारे धोपटे मार्ग होतेच, पण खरा प्रभावी मार्ग म्हणजे लोकसेवा हा होय. ख्रिश्चन मिशनरी सर्वत्र तोच अनुसरतात. ते जेथे जातील तेथे शाळा, दवाखाने काढतात. लोकांची दुःखे निवारण करतात; आणि या मार्गांनी लोकांची भक्ती जडली की मग ख्रिश्चन धर्माचा उपदेश करतात. समर्थांनी आपल्या मठपतींना, महंतांना हाच मार्ग सांगितला होता.