पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
३६०
 


प्रचीती
 समर्थांचा प्रचीतिवाद हा त्यांच्या बुद्धियोगाचाच एक भाग आहे. अलीकडे ज्याला आपण इहवाद म्हणतो त्यासारखाच हा प्रचीतिवाद आहे. बुद्धी, इतिहास, तर्क, अनुभव यांच्या आधारे प्रत्येक गोष्ट तपासून मगच तिचा स्वीकार किंवा त्याग करावयाचा, अंधश्रद्धेने, भोळ्या श्रद्धेने काहीही स्वीकारावयाचे नाही, हा इहवादाचा गाभा आहे. समर्थांच्या प्रचीतिवादाचा आशय तोच आहे. ते म्हणतात, 'ऐका प्रचीतीची लक्षणे, प्रचीत पाहतील ते शहाणे, येर वेडे दैन्यवाणे, प्रचीतीवीण ॥' असे प्रस्तावनेत सांगून पुढे रत्ने तपासून घ्यावी, सोने तपासून घ्यावे, घोडे, शस्त्रास्त्रे तपासून घ्यावी, कोणत्याही धान्याचे बी प्रथम पेरून पाहून उगवेलसे दिसले तरच घ्यावे, औषधही बरेवाईट अनुभवाने ठरवावे, असा प्रचीतीचा व्याप सांगितला आहे. आणि मग, 'शोधून पाहिल्यावीण, काहीतरी येक कारण, होणार नाही उलट निर्वाण, प्राणासि घडे ॥' प्राण मात्र जातील, असे बजावले आहे (दास, १०-८).

बुद्धिवाद
 हे नित्याच्या व्यवहाराविषयी झाले. पण धर्माच्या, परलोकाच्या क्षेत्रातही त्यांनी असाच कठोर बुद्धिवाद आणि प्रचीतिवाद सांगितला आहे. श्राद्धपक्ष, स्वप्नातील दृष्टांत, पुढील जन्मावरील भरवसा हे सर्व भ्रामक आहे, असे ते म्हणतात. 'आता जे जे देइजेते । ते ते पुढे पाविजेते । मेले माणूस भोजना येते । या नाव भ्रम ॥ ये जन्मीचे पुढीलिये जन्मी । काही एक पावेन मी । प्रीति गुंतली मनुष्याचिये नामी । या नाव भ्रम ॥ मेले मनुष्य स्वप्ना आले । तेणे काही मागितले । मनी अखंड बैसले । या नाव भ्रम ॥ देहाभिमान, कर्माभिमान । जात्याभिमान, कुळाभिमान । ज्ञानाभिमान, कुळाभिमान । या नाव भ्रम ॥ ब्रह्मा लिहितो अदृष्टी । आणि वाचून जाते सटी (सटवी) | ऐसा प्रकारीच्या गोष्टी । या नाव भ्रम ॥' (दास, १०-६)
 याप्रमाणे भ्रमांचा तपशील देऊन समर्थ शेवटी म्हणतात, उदंड भ्रम विस्तारला, अज्ञान जनी पैसावला । अल्पसंकेते बोलिला, कळावया कारणे ॥ सर्व लोक अज्ञानात, भ्रमात बुडून गेले आहेत. असे भ्रम अनेक आहेत. येथे मी थोडक्यात सर्व सांगितले आहे. नवव्या दशकाच्या पाचव्या समासात तर जे पिंडी ते ब्रह्मांडी हा सिद्धांतही प्रचीतीवाचून मानू नये असे त्यांनी सांगितले आहे. कारण 'प्रचीतीवीण जे बोलणे ते अवघेचि कंटाळवाणे । तोंड पसरूनि जैसे सुणे रडोनि गेले ॥ अवघेचि आंधळे मिळाले तेथे डोळसाचे काय चाले । अनुभवाचे नेत्र गेले तेथे अंधकार ॥'

मनसिक क्रांती
 समर्थांना राष्ट्रनिष्ठेच्या प्रसारासाठी या भ्रांत परलोकनिष्ठ, आंधळ्या, अज्ञ समा-