पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
३४०
 


पाइक
 तुकारामांचे 'पाइकाचे अभंग' ही क्षात्रधर्माला प्रेरणा देणारी रचना आहे. 'पाइक' याचा शिपाई, सैनिक असा येथे अर्थ आहे. या पाइकांवाचून प्रजांचे दुःख सरणार नाही, पाइकांनी जिवावर उदार झाले पाहिजे, गोळ्या, बाण, यांचा भडिमार साहिला पाहिजे, त्यांनी गनिमी कावा करून शत्रुला जिंकावे. असे पाइक ज्याच्या पदरी असतात तो नाईक त्रैलोक्याचा बलिया होतो, असे हे पाइकस्तोत्र आहे. ह. भ.प. विष्णुबुवा जोग यांनी या अभंगाचा परमार्थपर अर्थ केला आहे. पांगारकरांनी भक्त आणि सैनिक या दोघांना उद्देशून हे अभंग लिहिले आहेत, असे म्हटले आहे. डॉ. पेंडसे यांच्या मते यात क्षात्रधर्माचाच उपदेश आहे. अभंग नीट वाचल्यावर तेच बरोबर असावे असे वाटते.
 संतांनी केलेले राजधर्माचे प्रतिपादन हे एवढेच आणि हे सर्व अडीचशे वर्षांच्या दीर्घ काळात.

मर्यादा
 संसार आणि वर्णसमता याविषयीचे जे संतांचे धोरण त्याबद्दल जे वर सांगितले, तेच राजधर्माविषयी आहे. संसार करावा, वनात जाऊ नये, असे त्यांनी सांगितले खरे. पण तो संसार म्हणजे वमन आहे, त्याची किळस मानवी, स्त्रीपुत्र, आप्त इष्ट हे चोर आहेत, हे ध्यानात ठेवावे, असा उपदेश त्यांनी केला आहे. त्यांच्या वर्णसमतेविषयी असेच आहे. भक्तीचा अधिकार सर्वांना आहे. पण इतर व्यवहारात जातिभेद, वर्णभेद अत्यंत कडकपणे पाळले पाहिजेत, असा त्यांचा आग्रह आहे. त्यांचे क्षात्रधर्मा विषयीचे प्रतिपादन असेच समजून घेतले पाहिजे. त्यांनी त्याचे प्रत्यक्ष प्रतिपादन कोठेही केलेले नाही. यावनी आक्रमणाचा विचार ते चुकून सुद्धा करीत नाहीत. त्यांच्या डोळ्यांसमोर जे भयंकर अत्याचार घडत होते त्यांची दखलही त्यांनी कधी घेतली नाही. प्राचीन देवतांचे पराक्रम ते वर्णितात. आणि तेही त्याला आध्यात्मिक रंग देऊन. प्राचीन काळच्या मानवी पराक्रमाची चंद्रगुप्त, समुद्रगुप्त, शालिवाहन, सिंघण यांचीही वर्णने ते करीत नाहीत. त्यांचे राजधर्माचे प्रतिपादन हे असे आहे.
 याचे कारण एकच. ते त्यांचे उद्दिष्टच नव्हते. सर्व जातींना, हीन दीन दलितांना भक्ती हा मोक्षाचा मार्ग खुला करून द्यावा, या क्षेत्रात सम अधिकार आहे हे सांगावे, हे उद्दिष्ट त्यांच्या डोळ्यांसमोर होते. नाहीतर राजधर्माचे सविस्तर विवेचन त्यांनी केले असते. राजधर्मामध्ये संघटित बल, कोश, राजनीती, मुत्सद्देगिरी, इ. अनेक गोष्टी येतात. कोश, वन याला महाभारतकारांच्या मते किती महत्त्व आहे ते वर सांगितलेच आहे. पण संतांनी धनाची सरसहा निंदाच केली आहे. कारण त्यामुळे सर्वनाश होतो असे त्यांना वाटत होते.