पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२३
संतकार्य-चिकित्सा
 


जाती अप्रमाण
 विठ्ठल हा जातिभेद पाहत नाही, उच्चनीच भेद मानीत नाही, तो फक्त शुद्ध भाव पहातो, असे नामदेवांनीही सांगितले आहे. 'नाही यातिवर्ण, नाही या वेदोक्ती, नामेचि संतृप्ति होते जीवा ॥' 'नाही यातिकुळ, उंचनीच भेद, भाव एक शुद्ध पाहातसे ॥' असे ते म्हणतात.
 एकनाथांनी ज्ञानेश्वरांप्रमाणेच वर्णभेदासाठी वेदांवर टीका केली आहे. 'वेदे आप्त केले तीन्ही वर्ण । दुरावले स्त्रीशूद्रजन । न शिवे त्यांचे कान । हे वेदांसि न्यून पै आले ॥' आणि वेदांचा हा दोष घालविण्यासाठी श्रीकृष्णांनी गीता सांगितली असेही त्यांनी म्हटले आहे (एकनाथी भागवत, ४१ - २१) आणि वैष्णवांचे वर्णन करताना त्यांनी ज्ञानेश्वरांप्रमाणेच वर्णसमतेचे विचार सांगितले आहेत. 'वैष्णवांचा विचार करताना तेथे जाती अप्रमाण आहे, भक्तीच फक्त प्रमाण आहे. म्हणून तेथे शूद्र किंवा ब्राह्मण असे काही नाही. श्रेष्ठ जातीचा मनुष्य जर भक्तिहीन असेल तर तो वैष्णव नव्हे' (ए. भा. ११-४३). एकनाथ म्हणतात, 'श्वपच (चांडाळ) आणि ब्राह्मण यांच्यात अत्यंत भेद आहे. पण आत्मदृष्टीने पाहता दोघेही चिद्-रूपच आहेत.' (२९.१४) दोघांच्या ठायी एकच चिन्मय आत्मतत्त्व आहे.
 याही पुढे जाऊन, गुणांवरून वर्ण ठरतो, असे एकनाथांनी म्हटले आहे. 'ज्याची जीविका जेणे जाण । त्या ब्राह्मणाचा तोचि वर्ण ॥' जातीने ब्राह्मण असला तरी तो ज्या वर्णाचा उद्योग पोटासाठी करीत असेल तो त्याचा वर्ण होय. जो क्षत्रियाचा उद्योग करतो तो क्षत्रिय. वाणिज्य वृत्तीने राहणारा तो वैश्य आणि जो जातीने ब्राह्मण शूद्राची परिचर्यादी कर्म करतो तो वर्णाने शूद्र होय. आणि ज्या लोकांच्या ठायी असत्य, कृतघ्नता, हिंसक वृत्ती, इत्यादी दुर्गुण असतात 'तो हो का भलता वर्ण । परी अंत्यजपण त्या माजी ॥' (१७.२०). ते कोणत्याही वर्णाचे असले तरी ते अंत्यज होत.

सकळांसि अधिकार
 हो का भलते कुळ । शुचि अथवा चांडाळ । म्हणवी हरीचा दास । तुका म्हणे धन्य त्यास ॥ मनुष्य कोणत्याही कुळातला असो, चांडाळही असो, तो जर हरीचा दास असेल तर, तुकाराम त्याला धन्य समजतात. त्यांच्या मते, सकळांसि येथे- या भक्तिमार्गात- आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरिनामे ॥ म्हणून भेदाभेद भ्रम त्यांना अमंगळ वाटतो. ते म्हणतात, हे सर्व वर्ण एका देहाचेच अवयव आहेत. एकनाथांप्रमाणेच त्यांनीही म्हटले आहे की जन्माने एखादा मनुष्य अंत्यज असला तरी, 'तो जर रामकृष्ण नामे उच्चारी सरळे, आणि त्याच्या ठायी जर शांती, दया, क्षमा हे अलंकार असतील तर, तो ब्राह्मणच होय, तो मूर्तिमंत परब्रह्म होय.'