पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
३२०
 

 अशी ही संतांची वचने आहेत. त्यावरून हे ध्यानी येईल की ज्ञानेश्वर व नामदेव यांची धर्मतत्त्वेच त्यांनी आत्मसात केली होती आणि लोकांना त्यांचा उपदेशही ते करीत असत. त्या थोर पुरुषांच्या मानाने यांची विवेचने अल्प आहेत. पण भागवत धर्माचा सारार्थ तोच आहे ज्ञानेश्वर - नामदेवांचे पडसाद यांच्या रचनेतून पावलो - पावली कानी येत असतात. ज्ञानेश्वर या सर्वांचे परात्पर गुरू होते, हे तर यांपैकी प्रत्येकाने अनेकवार, मोठ्या भक्तीने, सांगितले आहे. तेव्हा ज्ञानेश्वरांनी या भागवत- धर्माचा पाया घातला होता आणि नामदेवांनी त्याचा विस्तार सर्वत्र केला होता, यात शंका नाही.
 वर सांगितल्याप्रमाणे संतांच्या भागवतधर्माच्या विवेचनाचा हा पूर्वार्ध झाला. पुढील प्रकरणात उत्तरार्ध विशद करून हे विवेचन संपवू.