पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
३०६
 

भजति - या गीता वचनावरील टीका) अशी भक्तियोगाचे स्वरूप विशद करणारी अनेक वचने ज्ञानेश्वरीत आढळतात.

वेदीचे वचन
 नामदेवांचीही भक्तीची व्याख्या अशीच आहे. ते भाळेभोळे भक्त होते असा समज आहे, तो खरा नाही. अद्वैत ज्ञानाच्या पायावरच त्यांचा भक्तियोग उभा आहे. 'पाषाण देवाची करिती जे भक्ती । सर्वस्वा मुकती मूढपणे ॥' असे त्यांनीही म्हटले आहे. सर्व भूतांचे प्रेम म्हणजेच परमेश्वराची भक्ती हाच त्यांच्या भक्तियोगाचा अर्थ आहे. 'सर्वाभूती विठ्ठल आहे आहे साचे | हे तव वेदीचे वचन जाण ॥', 'भूतदया करा, भक्तिभावे करा, भजन हरिहरा, वेद सांगे ॥' भूतदया हेच भक्तिभावाने हरिहरांचे केलेले भजन होय, असे वेद म्हणतात. 'सर्वांभूती भजन हेचि पै चोखडे । ब्रह्म माजिवडे करोनि घेई ॥' ब्रह्म हा मध्य कल्पून त्याच्या आश्रयाने राहणाऱ्या सर्वभूतांचे भजन करणे, हाच उत्तम मार्ग होय. अशा अनेक वाक्यांतून नामदेवांनी भक्तियोगाचा अर्थ स्पष्ट केला आहे.

सर्वाभूती विठ्ठल
 'विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म ॥', 'वंदीन मी भूते, आता अवधींचि समस्ते, तुमची करीन भावना, पदोपदी नारायणा ॥' सामान्य दैवते असतात - 'तैसा नव्हे नारायण, जग व्यापक जनार्दन, तुका म्हणे त्याचे करा चिंतन ॥', 'अवघे समब्रह्म आहे, सर्वांभूती विठ्ठल पाहे, रिता नाही कोणी ठाव, सर्वाभूतीं वासुदेव ॥' या अभंग- वाणीवरून तुकारामांचाही भक्तीचा अर्थ, सर्व भूतांवरील प्रेम, प्राणिमात्रांची सेवा, असाच आहे, हे दिसून येईल.
 सर्व भूतांच्या ठायी भगवंत असल्यामुळे त्या भूतांची सेवा, त्यांचे भजन, त्यांच्या दुःखाचे निवारण, यातच भक्तीची परिणती झाली पाहिजे हे उघडच आहे. त्यामुळे-

भक्तीची परिणती
 

जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती । देह कष्टवीती उपकारे ॥
भूतांची दया हे भांडवल संता । आपुली ममता नाही देही ॥
तुका म्हणे सुख पराविया सुखे । अमृत हे मुखे स्रवतसे ॥

हे संतांच्या भक्तियोगाचे सार आहे. 'जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपुले । तोची साधु ओळखावा । देव तेथेचि जाणावा ॥', 'दया, क्षमा, शांती । तेथे देवाची वसती ॥ भूत दया गाई, पशूंचे पालन, तान्हेल्या जीवन, बना माजी ॥ घडे जया उपकार भूतांची ते दया । आत्मस्थिती तया अंगी वसे ॥' तुकोबांच्या वाणीतून ते सार आपल्याला पदोपदी ऐकावयास मिळते.