पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
२९४
 

घटस्थापना केव्हा करावी हा प्रश्न असाच आहे. द्वितीयाविद्धा आश्विन प्रतिपदा असावी, असे दुर्गादेवीने स्वतः सांगितले आहे.
 पण काही पंडितांना ते मान्य नाही. ते म्हणतात की प्रतिपदा अमावास्याविद्धा असावी. द्वितीयाविद्धा अज्ञानाने जरी स्वीकारली, तरी स्वीकारणाऱ्याचे पुत्र मरतील. कालनिर्णयाचे माहात्म्य असे आहे. अज्ञानाने जरी तिथी चुकली तरी सर्वनाश ओढवतो. यातली मौजेची गोष्ट अशी की प्रत्येक व्रताच्या तिथीच्या कालाविषयी तीनचार तरी भिन्न मते असतातच. म्हणजे प्रत्येक व्रतात निषिद्ध काल कोणी तरी मानणारच; म्हणजे प्रत्येक वेळी कोणी तरी स्त्री विधवा होणारच, कोणाचे तरी पुत्र मरणारच !

अपराण्ह !
 श्राद्धपक्षांच्या काळाविषयी असेच मतभेद आहेत. श्राद्ध अपराण्ही करावे, असे वचन आहे. पण अपराण्ह केव्हा लागतो हा गंभीर प्रश्न आहे. हेमाद्री, अपरार्क यांनी याबद्दल पांडित्यपूर्ण विवेचन केले आहे ! दिवसाचे तीन भाग करावे आणि दुसऱ्याला अपराण्ह म्हणावे, असे एक मत आहे. पाच भाग करून चौथ्याला अपराण्ह म्हणावे असे दुसरे मत आहे. इतर पंडिताची आणखी भिन्न मते आहेत. बिचारे पितर ! या वादातून न कळत जरी त्यांच्या वंशजांनी चुकीचा अपराण्ह धरला, तरी त्यांना नरकात जावे लागणार ! एकभुक्त म्हणजे एकदाच व ते दिवसा जेवण्याचे व्रत. नक्त म्हणजे एकदाच पण रात्री जेवण्याचे व्रत. पण दिवसा म्हणजे केव्हा व रात्री म्हणजे केव्हा, याविषयी भिन्न असे सहा पक्ष आहेत ! शिवाय गृहस्थाश्रमीयांनी नक्त व्रतात सूर्यास्तानंतर रात्री भोजन करावे व यती आणि विधवा यांनी सूर्यास्तापूर्वी करावे असे शास्त्र आहे. आणि असे कशासाठी म्हणून विचारले तर, असे जाबालीवचन आहे, असे स्कांदवचन आहे, असे विज्ञानेश्वर म्हणतो, असे मदनरत्नात म्हटले आहे, असे उत्तर मिळते.

बालमन
 न्या. मू. रानडे यांनी म्हटले आहे की भारतात व्यक्तीची प्रतिष्ठा विकास पावू शकली नाही, याचे प्रधान कारण असे की आपल्यावरची धर्मबंधने ही तर्कहीन, कार्यकारणहीन अशी होती. यामुळे आपली प्रज्ञा हत झाली, मन बालपणातच राहिले. त्याला प्रौढत्व आलेच नाही. मानवाला बंधने, व्रते निश्चित असावी. पण त्यात कार्य- कारणसंगती असली पाहिजे, त्यांची बरी वाईट फळे बुद्धीला कळली पाहिजेत. पण वरील काळातील धर्मशास्त्रात एकाही ठिकाणी असा बुद्धिगम्य विधिनिषेध सांगितलेला नाही. भारतीयांची मने दुबळी झाली, त्यांची प्रज्ञा हत झाली, त्यांची बुद्धी पांगळी झाली, त्याचे प्रधान कारण हे आहे. गेल्या हजार वर्षातले आपले धर्मशास्त्र जड होते, आंधळे होते, अदृष्टप्रधान होते, अर्थशून्य होते.