पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
२९२
 

 वेदकाळापासून भारताच्या धमशास्त्रात दोन विचारप्रवाह दिसतात हे, मागें यादव- पूर्वकाळातील धर्माच्या स्वरूपाची चर्चा करताना, विशद करून सांगितलेच आहे. बुद्धिप्रामाण्य, समता, प्रवृत्ती, लोकसंग्रह, धर्माची परिवर्तनीयता, लोकाभिमुखता, स्वराज्य व स्वधर्म यांचा अभेद, राजधर्म, क्षात्रधर्म यांची श्रेष्ठता हा एक विचारप्रवाह आणि शब्दप्रामाण्य, विषमता, निवृत्ती, वैयक्तिकता, अपरिवर्तनीयता, समाजविमुखता, स्वराज्य - राजधर्म यांविषयी उदासीनता, हा दुसरा विचारप्रवाह होय. इ. सनाच्या दहाव्या अकराव्या शतकात दुसऱ्या प्रवाहाचा जोर झाला, पहिला उत्तरोत्तर क्षीण होऊ लागला आणि त्यामुळेच या देशाचे नष्टचर्य ओढविले. तो मुस्लिम आक्रमणाला बळी पडला आणि विद्या, कला, धनदौलत, कृषी, व्यापार या सर्व दृष्टींनी नागविला गेला. अशा स्थितीत धर्मवेत्त्यांनी रूढ धर्मतत्त्वांचा पुनर्विचार करून, धर्मसुधारणा करणे अवश्य होते. समाजघातक अशा रूढी त्याज्य ठरवून, उत्कर्षकारक अशी नवी तत्त्वे समाजाला उपदेशावयास हवी होती. धर्मवेत्त्यांचे हेच कार्य आहे. पण बहामनी कालातील या शास्त्रीपंडितांनी असे तर काही नाहीच केले. उलट त्यांनी धर्माला जास्त वैयक्तिक, समाजविमुख, परलोकनिष्ठ व जड कर्मकांडात्मक रूप देऊन, महाराष्ट्र समाजाची संपूर्ण अधोगती व्हावी, अशीच व्यवस्था करून ठेवली.

निर्णयसिंधू
 हेमाद्रीचा 'चतुर्वर्गचिंतामणी', अनंतदेवाचा 'स्मृतिकौस्तुभ' कमलाकर भट्टाचे 'निर्णयसिंधू' व ' शूद्रकमलाकर', रघुनंदनाचा 'शुद्धितत्व' हे ग्रंथ वरवर जरी चाळून पाहिले तरी, धर्मविचारात या धर्मशास्त्रज्ञांच्या मते महत्त्व कशाला होते, ते सहज दिसून येईल. यांतील कमलाकर भट्टाचा 'निर्णयसिंधू' हा ग्रंथ प्रातिनिधिक म्हणून आपण घेऊ. यात विज्ञानेश्वर, हेमाद्री, अपरार्क, रघुनंदन इ. धर्मवेत्त्यांची मते तो दर वेळी उद्धृत करतो व बहुधा त्यांच्या आधारेच निर्णय देतो. तेव्हा या एका ग्रंथावरून त्या वेळच्या धर्मशास्त्राचे स्वरूप कळून येईल. (१) एकभुक्त, नक्त, कार्तिक स्नान, माघस्नान, एकादशी, चतुर्थी, कोकिला व्रत, अनंत व्रत इ. व्रते, त्यांचे आरंभ व त्यांची उद्यापने (२) जातकर्म, नामकरण, चौल इ. सोळा संस्कार (३) नित्य श्राद्ध, नैमित्तिक श्राद्ध, सपिंड श्राद्ध, पार्वण श्राद्ध, कर्मांग श्राद्ध, पुष्टी श्राद्ध इ. श्राद्धांचे बारा भेद व त्यांची लक्षणे (४) अशौच, (सोयर सुतक), जननाशौच, मृताशौच, मुंज झालेल्यांचे, न झालेल्यांचे अशौच, स्त्रीशूद्रांचे अशौच, आणि (५) प्राजापत्य, कृच्छ्र, चांद्रायण इ. प्रायश्चित्ते हे यातील मुख्य विषय आहेत. 'निर्णयसिंधू' हा ग्रंथ इ. स. १६१० च्या सुमारास लिहिलेला आहे. त्या वेळी महाराष्ट्र समाजाच्या दैन्य- दारिद्र्याची पराकाष्ठा झाली होती. तरी त्याचा लवमात्रही विचार या ग्रंथात केलेला नाही. राजधर्म नाही, क्षात्रधर्म नाही, आक्रमणाचा प्रतिकार नाही, धर्मांतरितांची शुद्धी नाही, समाजसंघटना नाही, समाजाचे बळ, सामर्थ्य नाही ! हा विषय धर्मात येतच