पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२९१
शास्त्री पंडित
 


धर्माची तरुणता ?
 हा विचार करू लागताच पहिली गोष्ट ध्यानात येते ती ही की या धर्मशास्त्रज्ञांनी, आपल्या भोवतालच्या परिस्थितीचा, क्षणमात्रही विचार केला नव्हता. बहामनी सुलतान व त्यांचे सरदार दीन, अनाथ, हिंदू प्रजेवर भयानक जुलूम करीत होते, स्त्रियांवर अत्याचार करीत होते, देवळे पाडीत होते, मूर्ती फोडीत होते, धनदौलतीची लूट करीत होते; शेती उत्सन्न होत होती; व्यापार बसत चालला होता; अवर्षण, दुष्काळ यांनी लोकांची अन्नान्नदशा होत होती; पण धर्मशास्त्राने याची दखल घेतली पाहिजे, या आपतींच्या निवारणार्थ काही उपाययोजना केली पाहिजे असे या धर्मशास्त्रज्ञांच्या स्वप्नातही कधी आले नाही. धर्माचा व या दीनदशेचा, त्यांच्या लेखी, काही संबंधच नव्हता. धर्मामुळे अभ्युदयही साधला पाहिजे, समाजाची धारणा झाली पाहिजे, धर्म- नियम हे समाजाच्या प्रभावासाठी, उत्कर्षासाठी केलेले असतात, लोकसंग्रह हे धर्माचेच कार्य आहे, हा प्राचीन थोर धर्मवेत्त्यांचा विचार या शास्त्रीपंडितांच्या दृष्टीपुढे कधीही नव्हता. यादव राजा कृष्णदेव - कन्हरदेव - (१२४७ - १२६०) याची प्रशस्ती गाताना 'कालवशात क्षीण झालेल्या धर्माला त्याने पुन्हा तरुणता प्राप्त करून दिली' असे हेमाद्रीने म्हटले आहे. या कन्हरदेवाच्याच काळात, महाराष्ट्रात मुस्लिमांचे धार्मिक आक्रमण चालू झाले होते. देवगिरीजवळच्या परिसरात ते मशिदी उभारीत होते. लोकांना इस्लामची दीक्षा देत होते व इस्लामचा प्रसार करीत होते. पण यामुळे काही धर्महानी होते, असे हेमाद्रीला वाटत नसावे. कारण याच वेळी 'कृष्णदेवाने धर्माला तारुण्य प्राप्त करून दिले होते', असे तो म्हणतो. धर्माची अशी सुस्थिती, असा उत्कर्ष असतानाच, मुस्लिमांचे प्रथम धार्मिक व नंतर राजकीय आक्रमण झाले व त्यात महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याचा लोप झाला. यावरून धर्माचा स्वातंत्र्याच्या अस्तोदयाशी, प्रजेच्या उत्कर्षापकर्षाशी काही संबंध असतो, हे या धर्मवेत्त्यांना मान्य नव्हते, असे दिसते.

सुखद अज्ञान
 विज्ञानेश्वर, अपरार्क, हेमाद्री, कमलाकर भट्ट इ. धर्मशास्त्रजांना, म. म. डॉ. काणे हे मध्यमयुगीन धर्मशास्त्रज्ञ म्हणतात, आणि त्यांच्या कार्याचे विवेचन करताना म्हणतात, 'या काळात मुस्लिम सर्वत्र देवळे पाडीत होते. लोकांना सक्तीने बाटवीत होते. अत्याचार करीत होते. पण त्या वेळचे धर्मशास्त्रज्ञ व्रते, प्रायश्चित्तविधी, श्राद्धविधी, तीर्थयात्रा, अशौच यांवर आपले सर्व बुद्धिबळ खर्च करीत होते. सर्व भारताला घेरीत चाललेल्या राजकीय व धार्मिक घोर आपत्तींविषयी ते अगदी अलिप्त होते. त्यासंबंधीच्या सुखद अशा अज्ञानातच ते रहात होते.' (धर्मशास्त्राचा इतिहास, खंड ५ वा, पृ. ४७).